05-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आनंदा सारखे दुसरे भोजन नाही, तुम्ही आनंदामध्ये चालता-फिरता पायी चालताना बाबांची आठवण करा तर पावन बनाल”

प्रश्न:-
कोणतेही कर्म विकर्म बनू नये याकरिता कोणती युक्ती आहे?

उत्तर:-
विकर्मांपासून वाचण्याचे साधन आहे - श्रीमत. बाबांचे जे पहिले श्रीमत आहे की, ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’, या श्रीमताचे पालन करा तर तुम्ही विकर्माजीत बनाल.

ओम शांती।
रूहानी मुले इथे देखील बसली आहेत आणि सर्व सेंटर्सवर सुद्धा आहेत. सर्व मुले जाणतात की आता रूहानी बाबा आलेले आहेत, ते आम्हाला या जुन्या घाणेरड्या पतित दुनियेमधून पुन्हा घरी घेऊन जातील. बाबा पावन बनवण्यासाठीच आले आहेत आणि आत्म्यांशीच बोलतात. आत्माच कानांनी ऐकते कारण बाबांना तर स्वतःचे शरीर नाहीये म्हणून बाबा म्हणतात - ‘मी शरीराच्या आधारे माझी ओळख करून देतो. मी या साधारण तनामध्ये येऊन तुम्हा मुलांना पावन बनण्याची युक्ती सांगतो. ते देखील प्रत्येक कल्पामध्ये येऊन तुम्हाला ही युक्ती सांगतो. या रावणराज्यामध्ये तुम्ही किती दुःखी बनले आहात. तुम्ही रावण राज्य, शोक वाटिकेमध्ये आहात’. कलियुगाला म्हटलेच जाते दुःखधाम. सुखधाम आहे कृष्णपुरी, स्वर्ग. तो तर आता नाही आहे. मुले चांगल्या प्रकारे जाणतात की, आता बाबा आम्हाला शिकविण्यासाठी आले आहेत.

बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या घरात सुद्धा शाळा बनवू शकता. पावन बनायचे आहे आणि बनवायचे आहे. तुम्ही पावन बनलात तर मग दुनिया देखील पावन बनेल. आता तर ही भ्रष्टाचारी पतित दुनिया आहे. आता आहे रावणाची राजधानी. या गोष्टी जे चांगल्या प्रकारे समजतात, ते मग इतरांना देखील समजावून सांगतात. बाबा तर फक्त एवढेच म्हणतात - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा, इतरांना देखील असे समजावून सांगा’. बाबा आलेले आहेत, म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. कोणतेही आसुरी कर्म करू नका. माया तुमच्याकडून जे वाईट कर्म करून घेईल ते कर्म नक्की विकर्म बनेल. पहिल्यांदा जे म्हणतात ईश्वर सर्वव्यापी आहे, हे देखील तुमच्याकडून मायेने बोलून घेतले ना. माया तुमच्याकडून प्रत्येक गोष्टीमध्ये विकर्मच करून घेईल. कर्म-अकर्म-विकर्माचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. श्रीमतावर अर्धेकल्प तुम्ही सुख उपभोगता, आणि मग अर्धेकल्प रावणाच्या मतामुळे दुःख भोगता. या रावणराज्यामध्ये तुम्ही जी भक्ती करता त्याने तर खालीच उतरत आला आहात. तुम्ही या गोष्टींना जाणत नव्हता, एकदम पत्थर-बुद्धी होता. ‘पत्थर-बुद्धी’ आणि ‘पारस-बुद्धी’ असे म्हणतात तर खरे ना. भक्तीमार्गामध्ये म्हणतात देखील - ‘हे ईश्वरा, यांना चांगली बुद्धी द्या, म्हणजे हे युद्ध इत्यादी बंद करतील’. तुम्ही मुले जाणता बाबा आता खूप चांगली बुद्धी देत आहेत. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुमची आत्मा जी पतित बनली आहे, तिला आठवणीच्या यात्रेने पावन बनवायचे आहे’. भले हिंडा-फिरा, बाबांच्या आठवणीमध्ये राहून तुम्ही कितीही पायी चालत जाल तर तुम्हाला शरीर सुद्धा विसरायला होईल. गायले जाते ना - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. मनुष्य पैसे कमावण्यासाठी किती दूर-दूरवर आनंदाने जातात. इथे तुम्ही किती श्रीमंत, संपत्तीवान बनता. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येऊन तुम्हा आत्म्यांना माझा परिचय देतो. यावेळी सगळेच पतित आहेत, जे बोलावत राहतात की, आम्हाला पावन बनविण्यासाठी या. आत्माच बाबांना बोलवते. रावण राज्यामध्ये शोक वाटिकेमध्ये सर्व दुःखी आहेत. रावणराज्य साऱ्या दुनियेमध्ये आहे. यावेळी आहेच तमोप्रधान सृष्टी. सतोप्रधान देवतांची चित्रे उभी आहेत. गायन देखील त्यांचे आहे. शांतीधाम, सुखधामला जाण्यासाठी माणसे किती डोकेफोड करतात. हे थोडेच कोणी जाणतात - भगवान कसे येऊन भक्तीचे फळ आपल्याला देईल. तुम्ही आता समजता - आम्हाला भगवंताकडून फळ मिळत आहे. भक्तीची दोन फळे आहेत - एक मुक्ती, दुसरे जीवनमुक्ती. या अति सूक्ष्म समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यांनी सुरवातीपासून खूप भक्ती केली असेल, ते चांगल्या प्रकारे ज्ञान घेतील आणि फळ सुद्धा चांगले मिळवतील. कमी भक्ती केली असेल तर ज्ञान सुद्धा कमी घेतील, फळ सुद्धा कमी मिळेल. हिशोब आहे ना. नंबरवार पदे आहेत. बाबा म्हणतात - माझे बनल्यानंतर विकारामध्ये पडलात तर याचा अर्थ मला सोडले. एकदम अधःपतन होईल. कोणी तर पतन होऊन पुन्हा सावरतात. कोणी तर मग अगदी गटारातच पडतात, बुद्धी अजिबात सुधारतच नाही. कोणाला आतून मन खाते, दुःख होते - आम्ही भगवंतासमोर प्रतिज्ञा केली आणि मग त्यांना धोका दिला, विकारामध्ये पडलो. बाबांचा हात सोडला, मायेचा बनलो. ते मग वायुमंडळच खराब करून टाकतात, शापित होतात. बाबांच्या सोबत धर्मराज सुद्धा आहे ना. त्यावेळी समजत नाही की आपण काय करत आहोत, नंतर पश्चात्ताप होतो. असे खूप असतात, कोणाचा खून वगैरे करतात त्यामुळे जेलमध्ये जावे लागते, मग पश्चात्ताप होतो - उगाच त्यांना मारले. रागात येऊन बरेचजण मारतात देखील. भरपूर बातम्या वर्तमानपत्रात येतात. तुम्ही तर वर्तमानपत्र वाचत नाही. जगात काय-काय होत आहे, तुम्हाला माहिती होत नाही. दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत जाते. शिडीवरून खाली उतरायचेच आहे. तुम्ही या ड्रामाच्या रहस्याला जाणता. बुद्धीमध्ये ही गोष्ट आहे की, आपण बाबांचीच आठवण करावी. कोणतेही असे वाईट कृत्य करायचे नाही ज्यामुळे रजिस्टर खराब होईल. बाबा म्हणतात - मी तुमचा टीचर आहे ना. टीचरकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे आणि वर्तणुकीचे रेकॉर्ड असते ना. कोणाची वर्तणूक खूप चांगली, कोणाची कमी, कोणाची अगदी वाईट असते. नंबरवार असतात ना. हे सर्वोच्च बाबा देखील किती श्रेष्ठ शिक्षण देत आहेत. ते देखील प्रत्येकाची वर्तणूक जाणतात. तुम्ही स्वतःदेखील समजू शकता - आपल्याला ही सवय आहे, यामुळे मी नापास होणार. बाबा प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगतात. पूर्णपणे अभ्यास केला नाहीत, कोणाला दुःख द्याल तर दुःखी होऊन मराल. पद सुद्धा भ्रष्ट होईल. सजा देखील खूप खावी लागेल.

गोड मुलांनो, आपले आणि दुसऱ्यांचे नशीब बनवायचे असेल तर दयाळूपणाचा संस्कार धारण करा. जसे बाबा दयाळू आहेत म्हणून तुम्हाला टिचर बनून शिकवतात. काही मुले चांगल्या प्रकारे शिकतात आणि शिकवतात, यासाठी दयाळू बनावे लागते. टिचर दयाळू आहेत ना. कमाईचा मार्ग सांगतात की तुम्ही चांगले पद कसे मिळवू शकाल. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये तर अनेक प्रकारचे टिचर्स असतात. हे तर एकच टिचर आहेत. अभ्यास देखील एकच आहे - मनुष्यापासून देवता बनण्याचा. यामध्ये मुख्य आहे पवित्रतेची गोष्ट. सर्व पवित्रतेसाठीच याचना करतात. बाबा तर मार्ग सांगत आहेत परंतु ज्यांच्या नशीबातच नसेल तर पुरुषार्थ तरी कसला करणार! उत्तम मार्क्स मिळणारच नसतील तर टिचर तरी काय करणार! हे बेहदचे टीचर आहेत ना. बाबा म्हणतात - तुम्हाला दुसरे कोणीही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा इतिहास-भूगोल सांगू शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेहदची समजावून सांगितली जाते. तुमचे आहे बेहदचे वैराग्य. हे देखील तुम्हाला तेव्हा शिकवतात जेव्हा पतित दुनियेचा विनाश आणि पावन दुनियेची स्थापना करायची आहे. संन्यासी तर निवृत्ती मार्गवाले आहेत, खरे तर त्यांनी जंगलातच रहावे. पूर्वीचे ऋषी-मुनी इत्यादी सर्व जंगलामध्ये राहत होते, ती सतोप्रधान ताकद होती, त्यामुळे लोकांना आकर्षित करत होते. कुठल्या कुठे झोपड्यांमध्ये सुद्धा त्यांना जेवण नेऊन देत होते. संन्याशांची कधी मंदिरे बनवत नाहीत. मंदिरे नेहमी देवतांची बनवतात. तुम्ही काही भक्ती करत नाही. तुम्ही योगामध्ये राहता. त्यांचे तर ज्ञानच आहे ब्रह्म तत्त्वाची आठवण करण्याचे. बस्स, ब्रह्म तत्वामध्ये लिन व्हावे. परंतु बाबांशिवाय तिथे तर कोणी घेऊन जाऊ शकत नाही. बाबा येतातच संगमयुगावर. येऊन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. बाकी सर्वांचे आत्मे परत निघून जातात कारण तुमच्यासाठी नवीन दुनिया पाहिजे ना. जुन्या दुनियेतील कोणीही राहता कामा नये. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. हे तर तुम्ही जाणता - जेव्हा आपले राज्य होते तेव्हा साऱ्या विश्वामध्ये आपणच होतो, दुसरा कोणताही खंड नव्हता. तिथे जमीन तर पुष्कळ असते. इथे जमीन कित्ती आहे तरी देखील समुद्रामध्ये भर टाकून जमीन तयार करत रहातात कारण मनुष्य वाढत जात आहेत. ही जमीन भर टाकून तयार करणे इत्यादी परदेशी लोकांकडून शिकले आहेत. मुंबई पूर्वी काय होती तरी देखील रहाणार नाही. बाबा तर अनुभवी आहेत ना. समजा भूकंप झाले किंवा मुसळधार पाऊस पडला तर काय करणार! बाहेर तर निघू शकणार नाहीत. नैसर्गिक आपत्ती तर खूप येतील. नाही तर इतका विनाश कसा होईल? सतयुगामध्ये तर थोडेसे फक्त भारतवासीच असतात. आज काय आहे, उद्या काय होईल; हे सर्व तुम्ही मुलेच जाणता. हे ज्ञान इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - तुम्ही पतित बनला आहात म्हणून आता मला बोलवता की येऊन पावन बनवा; तर मग नक्कीच येतील, तेव्हाच तर पावन दुनिया स्थापन होईल ना. तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत. किती चांगली युक्ती सांगतात. भगवानुवाच - मनमनाभव. देहासहीत देहाचे सर्व संबंध तोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. यामध्येच मेहनत आहे. ज्ञान तर खूप सोपे आहे. अगदी लहान मुलाच्या देखील लगेच लक्षात येईल. बाकी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करेल, हे अशक्य आहे. मोठ्यांच्या बुद्धीमध्येच रहात नाही, तर छोटे मग कशी काय आठवण करू शकतील? भले शिवबाबा-शिवबाबा म्हणतील सुद्धा परंतु आहेत तर अज्ञानी ना. आपणही बिंदू आहोत, बाबा सुद्धा बिंदू आहेत, हे लक्षात ठेवणे अवघड वाटते. परंतु हेच यथार्थरित्या आठवण करणे आहे. काही मोठी गोष्ट तर नाहीये. बाबा म्हणतात - खऱ्या अर्थाने मी बिंदू आहे त्यामुळे मी जो आहे, जसा आहे तशी आठवण करणे, हे खूप अवघड आहे.

ते (दुनियावाले) तर म्हणतात परमात्मा ब्रह्म तत्त्व आहे आणि आपण म्हणतो ते एकदम बिंदू आहेत. रात्रं-दिवसाचा फरक आहे ना. ब्रह्म तत्त्व जिथे आपण आत्मे रहातो, त्याला परमधाम म्हणतात. बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे - मी आत्मा आहे, बाबांचा मुलगा आहे, या कानांनी ऐकतो, बाबा या मुखाद्वारे ऐकवतात की, ‘मी परम-आत्मा आहे, परे ते परे (पार पलीकडे) राहणारा आहे’. तुम्ही देखील परे ते परे राहता, परंतु जन्म-मरणामध्ये येता, मी येत नाही. तुम्हाला आता आपल्या ८४ जन्मांविषयी देखील समजले आहे. बाबांच्या पार्ट विषयी देखील समजून घेतले आहे. आत्मा काही कधी लहान-मोठी असत नाही. बाकी आयर्न-एजमध्ये (लोहयुगामध्ये) आल्यामुळे घाण होते (विकारी होते). इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये सारे ज्ञान आहे. बाबा देखील इतके सूक्ष्म आहेत ना. परंतु त्यांना परम-आत्मा म्हटले जाते. ते ज्ञानाचा सागर आहेत, येऊन तुम्हाला ज्ञान समजावून सांगतात. यावेळी तुम्ही जे शिकत आहात ते कल्पापूर्वी देखील शिकला होता, ज्यामुळे तुम्ही देवता बनला होतात. तुमच्यामध्ये सर्वात फुटके नशीब त्यांचे आहे जे पतित बनून आपल्या बुद्धीला विकारी बनवतात, कारण त्यांच्यामध्ये धारणा होऊ शकत नाही. मन आतल्या आत खात राहील. ते दुसऱ्या कोणालाही सांगू शकणार नाहीत की, पवित्र बना. आतून समजतात - आपण पावन बनता-बनता हार खाल्ली, केलेली कमाई सर्व नष्ट झाली. मग खूप वेळ लागतो. एकच जोरदार घाव घायाळ करून टाकतो, रजिस्टर खराब होते. बाबा म्हणतील - तू मायेकडून हार खाल्लीस, तुझे नशीब फुटके आहे. मायाजीत जगतजीत बनायचे आहे. जगतजीत महाराज-महाराणीलाच म्हटले जाते. प्रजेला थोडेच म्हणणार? आता दैवी स्वर्गाची स्थापना होत आहे. स्वतःसाठी जो करेल तो मिळवेल. जितके पावन बनून इतरांना बनवतील, खूप दान करणाऱ्याला तर फळ सुद्धा मिळते ना. दान करणाऱ्याचे नाव देखील होते. दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी सुख मिळते. इथे तर २१ जन्मांची गोष्ट आहे. पावन दुनियेचा मालक बनायचे आहे. जे पावन बनले होते तेच बनतील. चालता-चालता माया एकदम थप्पड मारून पाडून घालते. माया सुद्धा काही कमी शक्तीशाली नाहीये. ८-१० वर्षे पवित्र राहिला, पवित्रतेमुळे भांडणही झाले, दुसऱ्यांना सुद्धा पतन होण्यापासून वाचवले आणि मग स्वतःच घसरला (पतित बनला). नशीबच म्हणायचे ना. बाबांचा बनून मग मायेचा बनतो म्हणजे मग शत्रू झाला ना. खुदा दोस्तची देखील एक कहाणी आहे ना. बाबा येऊन मुलांवर प्रेम करतात, साक्षात्कार घडवतात, भक्ती केल्याशिवाय देखील साक्षात्कार होतो. तर दोस्त बनवले ना. किती साक्षात्कार होत होते आणि मग जादू समजून गदारोळ माजवू लागले तेव्हा बंद केले, पुन्हा अखेरीला तुम्ही खूप साक्षात्कार करत रहाल. पूर्वी किती मजा येत होती. ते बघत असून देखील कित्ती निघून गेले. भट्टीतून काही विटा पक्क्या भाजून निघाल्या, काही कच्च्या राहिल्या. कोणी तर पूर्णच कोसळून पडले. किती निघून गेले. आता ते लक्षाधीश, करोडपती बनले आहेत. समजतात की, आम्ही तर स्वर्गातच बसलो आहोत. आता स्वर्ग इथे कसा काय असू शकेल? स्वर्ग तर असतोच नवीन दुनियेमध्ये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपले श्रेष्ठ नशीब बनविण्याकरिता दयाळू बनून शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. कधीही एखाद्या सवयीच्या अधीन होऊन आपले रजिस्टर खराब करायचे नाही.

२) मनुष्यापासून देवता बनण्यासाठी मुख्य आहे पवित्रता, त्यामुळे कधीही पतित बनून आपल्या बुद्धीला अशुद्ध (विकारी) बनवायचे नाही. असे कर्म होऊ नये ज्यामुळे मन आतून खात राहील, पश्चाताप करावा लागेल.

वरदान:-
बीजरूप स्थितीद्वारे पूर्ण विश्वाला प्रकाशाचे पाणी देणारे विश्वकल्याणकारी भव

बीजरूप अवस्था सर्वात शक्तीशाली अवस्था आहे. हीच अवस्था लाईट हाऊसचे काम करते, यामुळे साऱ्या विश्वामध्ये लाईट (प्रकाश) पसरविण्याचे निमित्त बनता. जसे बीजाद्वारे आपोआपच पूर्ण झाडाला पाणी मिळते तसे जेव्हा बीजरूप अवस्थेमध्ये स्थिर राहता तेव्हा विश्वाला प्रकाश रूपी पाणी मिळते. परंतु साऱ्या विश्वामध्ये आपला प्रकाश पसरविण्यासाठी विश्व कल्याणकारीची शक्तीशाली अवस्था पाहिजे. याच्यासाठी लाईट हाऊस बना, बल्ब नको. त्यामुळे प्रत्येक संकल्पामध्ये हे लक्षात रहावे की, साऱ्या विश्वाचे कल्याण व्हावे.

बोधवाक्य:-
ॲडजेस्ट होण्याची शक्ती नाजुक वेळी पास विथ ऑनर बनवेल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-

परमात्म्याच्या प्रत्यक्षतेचा आधार सत्यता आहे. सत्यतेद्वारेच प्रत्यक्षता होईल - एक स्वतःच्या स्थितीची सत्यता, दुसरी आहे - सेवेची सत्यता. सत्यतेचा आधार आहे - स्वच्छता आणि निर्भयता. या दोन्ही धारणांच्या आधारे सत्यतेद्वारे परमात्म प्रत्यक्षतेचे निमित्त बना. कोणत्याही प्रकारची अस्वच्छता अर्थात थोडी जरी सच्चाई-सफाईची कमतरता असेल तर कार्याची सुद्धा सिद्धी होऊ शकत नाही.