13-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अगोदर प्रत्येकाकडून हा मंत्र प्रभावीपणे पक्का करून घ्या कि , तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे, आठवणीनेच पापे नष्ट होतील”

प्रश्न:-
खरी सेवा कोणती आहे, जी तुम्ही आता करत आहात?

उत्तर:-
भारत जो पतित बनला आहे, त्याला पावन बनविणे - हीच खरी सेवा आहे. लोक विचारतात की, तुम्ही भारताची काय सेवा करता? तुम्ही त्यांना सांगा की आम्ही श्रीमतावर भारताची ती रुहानी सेवा करतो ज्याद्वारे भारत डबल सिरताज (डबल शिरोमणी) बनणार. भारतामध्ये जी पीस, प्रॉस्पेरिटी (शांती आणि समृद्धी) होती, त्याची आम्ही स्थापना करत आहोत.

ओम शांती।
सर्वात पहिला पाठ (धडा) आहे - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजा’ अथवा ‘मनमनाभव’, हा आहे संस्कृत शब्द. आता मुले जेव्हा सेवा करतात तर सर्वप्रथम त्यांना अल्फचा (शिवबाबांचा) पाठ शिकवायचा आहे. जेव्हा कोणीही येईल तेव्हा शिवबाबांच्या चित्रासमोर घेऊन जायचे आहे, दुसऱ्या कोणत्याही चित्रासमोर नाही. सर्वप्रथम बाबांच्या चित्राजवळ आणून त्यांना सांगायचे आहे - ‘बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. मी तुमचा सुप्रीम पिता देखील आहे, सुप्रीम शिक्षक देखील आहे, सुप्रीम गुरु देखील आहे’. सर्वांना हा धडा शिकवायचा आहे. सुरुवातच तिथून करायची आहे. स्वतःला आत्मा समजून मज एक पित्याची आठवण करा; कारण तुम्ही जे पतित बनले आहात परत पावन सतोप्रधान बनायचे आहे. या धड्यामध्ये सर्व गोष्टी येतात. सर्वच काही अशा प्रकारे सांगत नाहीत. बाबा म्हणतात, सर्वात आधी शिवबाबांच्या चित्रासमोरच घेऊन जायचे आहे. हे बेहदचे बाबा आहेत. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. स्वतःला आत्मा समजा तर बेडा (जीवनरूपी नाव) पार आहे. आठवण करत-करत पवित्र दुनियेमध्ये पोहोचायचेच आहे. वारंवार हा पाठ कमीत-कमी तीन मिनिटे तरी पक्का करायचा आहे. बाबांची आठवण केलीत? बाबा, बाबा देखील आहेत, रचनेचे रचयिता देखील आहेत. रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात कारण मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत. सर्वप्रथम तर हा निश्चय करवून घ्यायचा आहे. तुम्ही बाबांची आठवण करता का? हे नॉलेज बाबाच देतात. आम्ही देखील बाबांकडून नॉलेज घेतले आहे, जे तुम्हाला देतो. सर्वप्रथम हा मंत्र पक्का करायचा आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर धनके (ईश्वराचे) बनाल. यावरच समजावून सांगायचे आहे. जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत पुढेच जायचे नाही. अशा बाबांचा परिचय देणारी दोन-चार चित्रे असायला हवीत. तर यावर चांगल्या रीतीने समजावून सांगितल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये येईल की, आपल्याला बाबांची आठवण करायची आहे, तेच सर्वशक्तिमान आहेत, त्यांची आठवण केल्यानेच पापे नष्ट होतील. बाबांची महिमा तर क्लियर आहे. सर्वप्रथम तर हे जरूर समजावून सांगितले पाहिजे की स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहाची सर्व नाती विसरा. मी शीख आहे, अमका आहे… हे सर्व सोडून एका बाबांची आठवण करायची आहे. सर्वप्रथम तर ही मुख्य गोष्ट त्यांच्या बुद्धीमध्ये पक्की करा. ते बाबाच पवित्रता, सुख, शांतीचा वारसा देणारे आहेत. बाबाच कॅरॅक्टर्स (चारित्र्य) सुधारतात. तर बाबांना विचार आला - पहिला पाठ या रीतीने पक्का करून घेत नाहीत, जो अत्यंत गरजेचा आहे. जितका हा पाठ चांगल्या रीतीने पक्का करून घ्याल तितका चांगला बुद्धीमध्ये लक्षात राहील. बाबांचा परिचय द्यायला भले पाच मिनिटे जास्त लागू दे, परंतु तिथून हलायचे नाही. खूप आवडीने बाबांची महिमा ऐकतील. हे बाबांचे चित्र आहे मुख्य. पूर्ण रांग या चित्रासमोर असली पाहिजे. बाबांचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. त्यानंतर आहे रचनेचे नॉलेज की हे चक्र कसे फिरते. ज्या प्रमाणे मसाला कुटून-कुटून एकदम बारीक केला जातो ना. तुम्ही ईश्वरीय मिशन आहात, तर चांगल्या रीतीने एक-एक गोष्ट बुद्धीमध्ये पक्की करून घ्यायची आहे कारण बाबांना न जाणल्यामुळे सर्वजण निधनके (अनाथ) बनले आहेत. परिचय द्यायचा आहे - ‘बाबा सुप्रीम पिता आहेत, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु आहेत’. तिन्ही म्हटल्यामुळे मग सर्वव्यापीची गोष्ट बुद्धी मधून निघून जाईल. सर्वात पहिले तर हेच बुद्धीमध्ये बसवा की बाबांची आठवण करायची आहे तेव्हाच तुम्ही पतिता पासून पावन बनू शकाल. दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत. सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही त्यांना बाबांची आठवण करून दिलीत, यामध्ये तुम्हा मुलांचे देखील कल्याण आहे. तुम्ही देखील मनमनाभव रहाल.

तुम्ही पैगंबर आहात तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. असा एकही मनुष्य नाही, ज्याला हे माहित आहे की बाबा आपले पिता देखील आहेत, टीचर आणि गुरु देखील आहेत. बाबांचा परिचय ऐकल्यामुळे ते खूप खुश होतील. भगवानुवाच - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. हे देखील तुम्ही जाणता. गीते सोबत मग महाभारत युद्ध देखील दाखविले आहे. आता आणखी दुसऱ्या कोणत्या युद्धाची तर गोष्टच नाही. तुमचे युद्ध आहेच मुळी बाबांची आठवण करण्यामध्ये. शिक्षण तर वेगळे आहे, बाकी युद्ध आहे आठवणीमध्ये कारण सर्व आहेत देह-अभिमानी. तुम्ही आता बनता देही-अभिमानी, बाबांची आठवण करणारे. सर्वप्रथम हे पक्के करून घ्या की ते पिता, टीचर आणि गुरु आहेत. आता आम्ही त्यांचे ऐकणार का तुमचे ऐकणार? बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता तुम्हाला पूर्णपणे श्रीमतावर चालायचे आहे श्रेष्ठ बनण्यासाठी’. आपण हीच सेवा करतो. ईश्वरीय मतावर चाला तर तुमची विकर्म विनाश होतील. बाबांचे श्रीमत हे आहे की मामेकम् (मज एकाची) आठवण करा. सृष्टीचे चक्र जे समजावून सांगता, ते देखील त्यांचे (बाबांचे) मत आहे. तुम्ही देखील पवित्र बनाल आणि बाबांची आठवण कराल तर बाबा म्हणतात, मी सोबत घेऊन जाईन. बाबा बेहदचे रूहानी पंडा (गाईड) देखील आहेत. शिवबाबा आम्हाला शिकवतात. बाबा तुम्हा मुलांना देखील म्हणतात चालता-फिरता, उठता-बसता बाबांची आठवण करत रहा. यामध्ये स्वतःला थकवण्याची देखील गरज नाही. बाबा बघतात - कधी-कधी मुले पहाटे येऊन बसतात तर नक्कीच थकून जात असतील. हा तर सहज मार्ग आहे. हठ करून बसायचे नाही. भले फेऱ्या मारा, हिंडाफिरा, खूप रुचीने बाबांची आठवण करा. आतून बाबा-बाबा असे खूप उचंबळून आले पाहिजे. उचंबळून त्यांना येईल जे प्रत्येक क्षण बाबांची आठवण करत राहतील. काही ना काही इतर गोष्टी ज्या बुद्धीमध्ये आहेत, त्यांना काढून टाकले पाहिजे. बाबांवर अति प्रेम असावे, ते अतिंद्रीय सुख भासत राहिले पाहिजे. जेव्हा तुम्ही बाबांची आठवण करत रहाल तेव्हाच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. आणि मग तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. या सर्व गोष्टींचे वर्णन इथे होते म्हणूनच गायन देखील आहे - ‘अतिंद्रिय सुख गोप-गोपींना विचारा, ज्यांना भगवान बाबा शिकवतात’.

भगवानुवाच माझी आठवण करा. बाबांचीच महिमा सांगायची आहे. सद्गतीचा वारसा तर एका बाबांकडूनच मिळतो. सर्वांना सद्गती मिळते जरूर. प्रथम सर्व जातील शांतीधाममध्ये. हे लक्षात असले पाहिजे की बाबा आपल्याला सद्गती देत आहेत. शांतीधाम, सुखधाम कशाला म्हटले जाते - हे तर समजावून सांगितले आहे. सर्व आत्मे शांतीधाममध्ये राहतात. ते आहे स्वीट होम, सायलेन्स होम. टॉवर ऑफ सायलेन्स. त्याला या डोळ्यांनी कोणीही पाहू शकत नाही. त्या सायन्सवाल्यांची बुद्धी तर इथे या डोळ्यांनी जी गोष्ट बघतात त्यानुसारच चालते. आत्म्यांना तर या डोळ्यांनी कोणी पाहू शकत नाही, समजू शकतात. जर आत्म्यालाच पाहू शकत नाही तर बाबांना मग कसे पाहू शकतील. ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना. या डोळ्यांनी दिसू शकत नाही. भगवानुवाच - ‘माझी आठवण करा तर पापे भस्म होतील’. हे कोणी म्हटले? पूर्णपणे समजू शकत नाहीत त्यामुळे श्रीकृष्णासाठी म्हणतात. श्रीकृष्णाची तर खुप आठवण करतात. दिवसेंदिवस व्यभिचारी होत जातात. भक्तीमध्ये देखील आधी एका शिवाचीच भक्ती करतात. ती आहे अव्यभिचारी भक्ती, नंतर मग लक्ष्मी-नारायणाची भक्ती… उच्च ते उच्च तर आहेत भगवान. तेच, हा विष्णू बनण्यासाठी वारसा देतात. तुम्ही शिव वंशी बनून मग विष्णुपुरीचे मालक बनता. माळ बनतेच तेव्हा, जेव्हा हा पहिला पाठ चांगल्या रीतीने शिकतात. बाबांची आठवण करणे काही मावशीचे घर नाही (इतके सोपे नाही). मन-बुद्धीला सर्व बाजूंनी काढून एका बाजूला लावायचे आहे. जे काही या डोळ्यांनी बघता त्यातून बुद्धीयोग काढून टाका.

बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, यामध्ये गोंधळून जायचे नाही. बाबा या रथामध्ये बसले आहेत, त्यांची महिमा करतात की ते निराकार आहेत. यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) तुम्हाला वारंवार याची आठवण करून देतात कि, तुम्ही मनमनाभव होऊन रहा. जणू काही तुम्ही सर्वांवर उपकार करता. तुम्ही तर भोजन बनविणाऱ्याला देखील सांगता - शिवबाबांची आठवण करत भोजन बनवा तर खाणाऱ्यांची बुद्धी शुद्ध होईल. एकमेकांना आठवण करून द्यायची आहे. प्रत्येकजण थोडा-थोडा वेळ आठवण करतात. कोणी अर्धा तास बसतात, कोणी दहा मिनिटे बसतात. अच्छा, ५ मिनिटे देखील प्रेमाने बाबांची आठवण केली तरी राजधानीमध्ये याल. राजा-राणी नेहमी सर्वांवर प्रेम करतात. तुम्ही देखील प्रेमाचे सागर बनता, म्हणून सर्वांवर प्रेम असते. प्रेमच प्रेम. बाबा प्रेमाचा सागर आहेत तर मुलांचे देखील जरूर असे प्रेम असेल, त्यामुळे तिथे देखील असेच प्रेम असणार. राजा-राणीचे देखील खूप प्रेम असते. मुलांचे देखील खूप प्रेम असते. प्रेम देखील बेहदचे. इथे तर प्रेमाचे नाव नाही तर मार आहे. तिथे हि काम कटारीची हिंसा देखील असत नाही, त्यामुळे भारताची महिमा अपरमअपार गायली आहे. भारतासारखा पवित्र देश आणखी कोणता नाही. हे सर्वात मोठे तीर्थ आहे. बाबा इथे (भारतामध्ये) येऊन सर्वांची सेवा करतात, सर्वांना शिकवतात. मुख्य आहे अभ्यास. तुम्हाला काहीजण विचारतात भारताची तुम्ही काय सेवा करता? तुम्ही बोला की, ‘तुमची इच्छा आहे भारत पावन व्हावा, आता पतित आहे ना, तर आम्ही श्रीमतावर भारताला पावन बनवतो. सर्वांना सांगतो - बाबांची आठवण करा तर पतिता पासून पावन बनाल’. आम्ही, ही रूहानी सेवा करत आहोत. भारत जो सिरताज (मुकुटमणी) होता, पीस- प्रॉस्पेरिटी (शांती आणि समृद्धी) होती त्याची आम्ही पुनर्बांधणी श्रीमतावर कल्पा पूर्वीप्रमाणे, ड्रामा प्लॅन अनुसार करत आहोत. हे शब्द पूर्णपणे लक्षात ठेवा. मनुष्याची इच्छा देखील आहे की, विश्वामध्ये शांती असावी. तर ते आम्ही करत आहोत. भगवानुवाच - बाबा आम्हा मुलांना समजावून सांगत असतात मज पित्याची आठवण करा. हे देखील बाबा जाणतात, तुम्ही इतकी थोडीच बाबांची आठवण करता. यातच मेहनत आहे. आठवणीद्वारेच तुमची कर्मातीत अवस्था होईल. तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. याचा अर्थ देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. शास्त्रांमध्ये तर किती गोष्टी लिहिल्या आहेत. आता बाबा म्हणतात - जे काही वाचले आहे ते सर्व विसरून जायचे आहे, स्वतःला आत्मा समजायचे आहे. तेच सोबत येणार आहे, आणखी काहीही सोबत येणार नाही. हि बाबांची शिकवण आहे, जी सोबत येणार आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहात.

छोट्या मुलांना देखील काही कमी समजू नका. जितके छोटे तितके जास्त नाव काढू शकतात. छोट्या-छोट्या मुली बसून मोठ-मोठ्या वृद्धांना समजावून सांगतील तर कमाल करून दाखवतील. त्यांना देखील आप समान बनवायचे आहे. कोणी प्रश्न विचारला तर रिस्पॉन्स देऊ शकतील (समाधान करू शकतील) इतके कन्यांना तयार करा. मग जिथे-जिथे सेंटर्स असतील किंवा म्युझियम असतील तर तिथे त्यांना पाठवून द्या. असा ग्रुप तयार करा. वेळ तर हीच आहे. अशा प्रकारे सेवा करा. मोठ्या वृद्धांना देखील छोट्या कुमारी बसून समजावून सांगतील तर कमाल आहे (चमत्कारच आहे). कुणी विचारले, तुम्ही कोणाची मुले आहात? तर बोला - ‘आम्ही शिवबाबांची मुले आहोत. ते निराकार आहेत. ब्रह्मा तनामध्ये येऊन आम्हाला शिकवत आहेत’. या शिक्षणानेच आम्हाला असे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. सतयुग आदिला या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. यांना असे कोणी बनविले? जरूर अशी कर्म केली असतील ना. बाबा बसून कर्म, अकर्म, विकर्माची गती सांगत आहेत. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. तेच पिता, टीचर, गुरु आहेत. तर बाबा समजावून सांगत आहेत की, मुख्य चित्रासमोर उभे करून त्या एका गोष्टीवरच समजावून सांगायचे आहे. सर्वात पहिले अल्फ, एकदा अल्फ विषयी व्यवस्थित समजले की मग इतके प्रश्न इत्यादी कोणी विचारणार नाहीत. अल्फला समजावून सांगितल्याशिवाय तुम्ही बाकी इतर चित्रांवर समजावून सांगितले तर डोके खराब करतील. पहिली गोष्ट आहे अल्फ ची. आपण श्रीमतावर चालतो. कोणी असे देखील निघतील जे म्हणतील अल्फला समजून घेतले, बाकी या चित्र इत्यादींना काय बघायचे आहे. आम्ही अल्फला जाणून घेतल्याने सर्व काही समजले आहे. भिक्षा मिळाली, हा गेला. तुम्ही फर्स्ट क्लास भिक्षा देता. बाबांचा परिचय करून देऊनच बाबांची जितकी आठवण कराल तितके तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अतींद्रीय सुखाचा अनुभव करण्यासाठी आतून बाबा-बाबा असे उचंबळून आले पाहिजे. हठ करून नाही, बाबांची चालता-फिरता रुचीने आठवण करा. बुद्धी सर्व बाजूंनी काढून एका मध्ये लावा.

२) जसे बाबा प्रेमाचे सागर आहेत, तसे बाप समान प्रेमाचे सागर बनायचे आहे. सर्वांवर उपकार करायचे आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे आणि सर्वांना बाबांची आठवण करून द्यायची आहे.

वरदान:-
शांतीच्या शक्तीच्या साधनांद्वारे विश्वाला शांत बनविणारे रूहानी शस्त्रधारी भव

शांतीच्या शक्तीचे साधन आहे - ‘शुभ संकल्प, शुभ भावना आणि नयनांची भाषा’. जसे वाणीच्या भाषेद्वारे बाबांचा आणि रचनेचा परिचय देता, तसे शांतीच्या शक्तीच्या आधारावर नयनांच्या भाषेद्वारे नयनांद्वारे बाबांचा अनुभव करवू शकता. स्थूल सेवेच्या साधनांपेक्षा जास्त करून सायलेन्सची शक्ती अति श्रेष्ठ आहे. रुहानी सेनेचे हेच विशेष शस्त्र आहे - या शस्त्राद्वारे अशांत विश्वाला शांत बनवू शकता.

बोधवाक्य:-
निर्विघ्न होऊन राहणे आणि निर्विघ्न बनविणे - हाच खऱ्या सेवेचा पुरावा आहे.