14-07-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.11.20  ओम शान्ति   मधुबन


“बाप समान बनण्यासाठी दोन गोष्टींच्या बाबतीत दृढता ठेवा - स्वमानामध्ये रहायचे आहे आणि सर्वांना सन्मान द्यायचा आहे”


आज बापदादा आपला अतिप्रिय, अतिगोड छोटासा ब्राह्मण परिवार म्हणा, ब्राह्मण संसार म्हणा, त्यालाच पाहत आहेत. असा छोटासा संसार अगदी न्यारा देखील आहे तर प्यारा (आवडता) सुद्धा आहे. का आवडता आहे? कारण या ब्राह्मण संसारातील प्रत्येक आत्मा विशेष आत्मा आहे. दिसायला तर अति सामान्य आत्मे दिसून येतात परंतु प्रत्येक ब्राह्मण आत्म्याची मोठ्यात मोठी विशेषता हीच आहे की परम-आत्म्याला आपल्या दिव्य-बुद्धी द्वारे ओळखले आहे. भले ९० वर्षांचे वृद्ध आहेत, आजारी आहेत परंतु परमात्म्याला ओळखण्याची दिव्य बुद्धी, दिव्य नेत्र ब्राह्मण आत्म्यांव्यतिरिक्त कोणत्याही नावाजलेल्या व्ही. व्ही. आय. पी.मध्ये सुद्धा नाही आहे. या सर्व माता इथे का पोहोचल्या आहेत? चालता येवो अथवा न येवो परंतु पोहोचल्या तर आहेत. तर बाबांना ओळखले आहे म्हणूनच तर पोहोचल्या आहेत ना! हा ओळखण्याचा नेत्र, ओळखण्याची बुद्धी तुमच्या शिवाय इतर कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही सर्व माता हे गाणे गाता ना - ‘हमने देखा, हमने जाना…’ मातांना हा नशा आहे? हात हलवत आहेत, खूप छान. पांडवांना नशा आहे? एकमेकांपेक्षा पुढे आहेत; ना शक्तींमध्ये कमी आहे, ना पांडवांमध्ये कमी आहे. परंतु बापदादांना हीच खुशी आहे कि हा छोटासा संसार किती सुंदर आहे. जेव्हा आपसामध्ये सुद्धा भेटता तर किती मनमोहक आत्मे वाटता!

बापदादा देश-विदेशच्या सर्व आत्म्यांद्वारे आज हेच हृदयातील गाणे ऐकत होते - ‘बाबा, मीठा बाबा हमने जाना, हमने देखा’. हे गाणे गात-गात चोहो बाजूची मुले एका बाजूला खुशीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या सागरामध्ये सामावलेली होती. चोहो बाजूचे जे कोणी इथे साकारमध्ये नाही आहेत परंतु मनाने, दृष्टीद्वारे बापदादांच्या समोर आहेत आणि बापदादा देखील साकारमध्ये दूर बसलेल्या मुलांना सन्मुखच पाहत आहेत. भले देश असो नाहीतर विदेश असो, बापदादा किती वेळात पोहोचू शकतात? फेरी मारू शकतात? बापदादा चोहो बाजूच्या मुलांना रिटर्नमध्ये अरब-खरब पेक्षा देखील जास्त प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. चोहो बाजूच्या मुलांना पाहून सर्वांच्या मनात एकच संकल्प बघत आहेत, सर्व नजरेने हेच सांगत आहेत कि, ‘आम्हाला परमात्म ६ महिन्यांचा होमवर्क लक्षात आहे’. तुमच्या देखील सर्वांच्या लक्षात आहे ना? विसरून तर गेला नाहीत ना? पांडवांच्या लक्षात आहे? व्यवस्थित लक्षात आहे? बापदादा वारंवार आठवण का करून देत आहेत? कारण? आताचा काळ बघत आहात, ब्राह्मण आत्मे स्वतःला देखील पाहत आहेत. मन तरुण होत जाते, शरीर वृद्ध होत जाते. काळ आणि आत्म्यांची हाक व्यवस्थित ऐकू येत आहे ना! तर बापदादा पाहत होते - आत्म्यांच्या अंतःकरणातील हाक वाढत आहे, ‘हे सुख-देवा, हे शांती-देवा, हे सच्चा आनंद-देवा थोडेसे ओंजळभर आम्हाला देखील द्या. विचार करा, हाका मारणाऱ्यांची लाईन किती मोठी आहे! तुम्ही सर्व विचार करता की बाबांची प्रत्यक्षता लवकरात लवकर व्हावी परंतु प्रत्यक्षता कोणत्या कारणामुळे थांबली आहे? जेव्हा तुम्ही देखील सर्वजण हाच संकल्प करता आणि मनातून इच्छा सुद्धा ठेवता, मुखावाटे म्हणता देखील - ‘आम्हाला बाप समान बनायचे आहे’. बनायचे आहे ना? आहे बनायचे? अच्छा, मग बनत का नाही आहात? बापदादांनी बाप समान बनायला सांगितले, काय बनायचे आहे, कसे बनायचे आहे, हे दोन्ही प्रश्न ‘समान’ शब्दामध्ये उद्भवू शकत नाहीत. काय बनायचे आहे? उत्तर आहे ना - ‘बाप समान’ बनायचे आहे. कसे बनायचे आहे?

फॉलो फादर - फूटस्टेप फादर-मदर (मात-पित्याच्या पावलावर पाऊल ठेवणे). निराकार बाबा, साकार ब्रह्मा मदर. फॉलो सुद्धा करता येत नाही काय? फॉलो तर आजकालच्या जमान्यामध्ये आंधळे सुद्धा करतात. बघितले आहे, आजकाल ते काठीच्या आवाजावर, काठीला फॉलो करत-करत कुठून कुठे पोहोचतात. तुम्ही तर मास्टर सर्वशक्तिवान आहात, त्रिनेत्री आहात, त्रिकालदर्शी आहात. फॉलो करणे ही तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट आहे काय! मोठी गोष्ट आहे का? बोला, मोठी गोष्ट आहे? मोठी नाही आहे परंतु मोठी होते. बापदादा सर्व ठिकाणी फेरी मारतात, सेंटरवर सुद्धा, प्रवृत्तीमध्ये सुद्धा. तर बापदादांनी पाहिले आहे, प्रत्येक ब्राह्मण आत्म्याजवळ, प्रत्येक सेंटरवर, प्रत्येकाच्या प्रवृत्तीच्या ठिकाणी जिकडे-तिकडे ब्रह्मा बाबांची चित्रे खूप लावलेली आहेत. भले मग अव्यक्त बाबांची आहेत नाहीतर ब्रह्मा बाबांची, जिकडे-तिकडे चित्रेच चित्रे पहायला मिळतात. चांगली गोष्ट आहे. परंतु बापदादा असा विचार करतात कि चित्राला पाहून चरित्र सुद्धा आठवत असेल ना! का फक्त चित्रच पाहता? चित्राला पाहून प्रेरणा तर मिळते ना! तर बापदादा आणखी तर काही सांगत नाहीत फक्त एकच शब्द सांगतात - ‘फॉलो करा’, बस्स. विचार करू नका, जादा प्लॅन बनवू नका, हे नको ते करू, असे नाही तसे, तसे नाही असे. नाही. जे बाबांनी केले, त्याची कॉपी करायची आहे, बस्स. कॉपी करता येत नाही का? आजकाल तर विज्ञानाने फोटोकॉपीच्या (झेरॉक्सच्या) सुद्धा मशीन्स काढल्या आहेत. काढल्या आहेत ना! इथे फोटोकॉपी आहे ना? तर हि ब्रह्मा बाबांची चित्रे लावता. जरूर लावा, व्यवस्थित लावा, मोठी-मोठी लावा. परंतु फोटोची कॉपी तर करा ना!

तर बापदादा आज चोहो बाजूंना फेरी मारत हे पाहात होते, चित्रावर प्रेम आहे कि चरित्रावर प्रेम आहे? संकल्प सुद्धा आहे, उमंग सुद्धा आहे, लक्ष्य सुद्धा आहे, आणखी काय हवे? बापदादांनी पाहिले, कोणत्याही गोष्टीला चांगल्या रीतीने मजबूत करण्यासाठी चारही कोपऱ्यातून त्याला व्यवस्थित मजबूत केले जाते. तर बापदादांनी पाहिले की, तीन कोपरे तर मजबूत आहेत, एक कोपरा अजून मजबूत व्हायचा आहे. संकल्प देखील आहे, उमंग सुद्धा आहे, लक्ष्य देखील आहे; कोणालाही विचारा - ‘काय बनायचे आहे?’ तर प्रत्येकजण म्हणतो, बाप समान बनायचे आहे. कोणीही असे म्हणत नाही - ‘बाबांपेक्षा कमी बनायचे आहे’, नाही. समान बनायचे आहे. चांगली गोष्ट आहे. एक बाजू मजबूत करता परंतु चालता-चालता ती कमजोर होते; आणि ती आहे दृढता. संकल्प आहे, लक्ष्य आहे परंतु एखादी पर-स्थिती येते, साध्या शब्दामध्ये त्याला तुम्ही लोक म्हणता - गोष्टी येतात, त्या दृढतेला कमजोर करतात. दृढता त्याला म्हटले जाते - ‘मरून जाऊ, संपून जाऊ परंतु संकल्पापासून ढळणार नाही’ झुकावे लागेल, जिवंतपणी मरावे लागेल, स्वतःला वाकवावे लागेल, सहन करावे लागेल, ऐकावे लागेल परंतु संकल्पापासून ढळणार नाही. याला म्हटले जाते दृढता. जेव्हा छोटी-छोटी मुले ओम निवासमध्ये आली होती तेव्हा ब्रह्मा बाबा त्यांना मिश्कीलपणे आठवण करून देत होते, पक्के बनवत होते कि, इतके सारे पाणी प्याल, एवढी मिरची खाल, घाबरणार तर नाही ना. मग डोळ्यांसमोर हात आणून झाकल्याप्रमाणे करत होते… तर ब्रह्मा बाबा छोट्या-छोट्या मुलांना पक्के करत होते, भले कितीही समस्या आल्या, संकल्प रुपी दृष्टी हलू नये. ती तर लाल मिरची आणि पाण्याचा मटका होता, छोटी मुले होती ना. तुम्ही तर सगळे मोठे आहात, तर बापदादा आज सुद्धा मुलांना विचारत आहेत कि तुमचा दृढ संकल्प आहे? संकल्पामध्ये दृढता आहे ना कि बाप समान बनायचेच आहे? बनायचे आहे असे नाही, बनायचेच आहे. अच्छा, यामध्ये हात हलवा. टी.व्ही.वाले फोटो काढा. टी.व्ही. वापरात यायला हवी ना! हात एकदम वर उंच करा. अच्छा, माता सुद्धा हात वर करत आहेत. मागे बसणारे आणखी हात वर उंच करा. खूप छान. केबिनमध्ये बसणारे हात वर करत नाही आहेत. केबिनमध्ये बसणारे तर निमित्त आहेत. अच्छा. थोड्या वेळासाठी तरी हात वर करून बापदादांना खुश केलेत.

आता बापदादा फक्त एकच गोष्ट मुलांकडून करून घेऊ इच्छितात, सांगू इच्छित नाहीत परंतु करून घेऊ इच्छितात. फक्त आपल्या मनामध्ये दृढता आणा, छोट्याशा गोष्टीमध्ये संकल्पाला कमजोर करू नका. कोणी इन्सल्ट केला, कोणी घृणा केली, कोणी अपमान केला, निंदा केली, कधीही कोणी दुःख देईल परंतु तुमची शुभ भावना नाहीशी होऊ नये. तुम्ही चॅलेंज करता आम्ही मायेला, प्रकृतीला परिवर्तन करणारे विश्व परिवर्तक आहोत, आपले स्वतःचे ऑक्युपेशन तर लक्षात आहे ना? विश्व परिवर्तक तर आहात ना! जर कोणी आपल्या संस्कारवश तुम्हाला दुःख जरी दिले, इजा केली, हादरवले, तर काय तुम्ही दुःखाच्या गोष्टीला सुखामध्ये परिवर्तन करू शकत नाही? इन्सल्ट सहन करू शकत नाही? शिवीला गुलाब बनवू शकत नाही? समस्येला बाप समान बनण्याच्या संकल्पामध्ये परिवर्तन करू शकत नाही? तुम्हा सर्वांच्या लक्षात आहे - जेव्हा तुम्ही ब्राह्मण जन्मामध्ये आला आणि निश्चय केला, मग तुम्हाला एक सेकंद लागला असेल किंवा एक महिना लागला असेल परंतु जेव्हा पासून तुम्ही निश्चय केला, अंतःकरणापासून म्हटले “मैं बाबा का, बाबा मेरा”. संकल्प केला ना, अनुभव केला ना! तेव्हा पासून तुम्ही मायेला चॅलेंज केले की मी मायाजीत बनणार. हे चॅलेंज मायेला केले होते ना? मायाजीत बनायचे आहे कि नाही? मायाजीत तुम्हीच आहात ना का अजून दुसरे येणार आहेत? जर मायेला चॅलेंज केले तर या समस्या, या गोष्टी, हि हलचल मायेचीच तर रॉयल रूपे आहेत. माया इतर कोणत्या रूपामध्ये तर येणारही नाही. या रूपांमध्येच मायाजीत बनायचे आहे. गोष्ट बदलणार नाही, सेंटर बदलणार नाही, ठिकाण बदलणार नाही, आत्मे बदलणार नाहीत, मला बदलायचे आहे. तुमचे स्लोगन तर सर्वांना खूप आवडते - ‘बदलून दाखवायचे आहे, बदला घ्यायचा नाही, बदलायचे आहे’. हे तर जुने स्लोगन आहे. नवीन-नवीन रूपे, रॉयल रूपे घेऊन माया अजूनच येणार आहे, घाबरू नका. बापदादा अंडरलाइन करत आहेत - माया या-या रूपामध्ये येणार आहे, येत आहे. ज्यांना जाणीवच होणार नाही कि हि माया आहे, ते म्हणतील - ‘दादी, तुम्हाला समजत नाही, हि माया नाहीये’. हि तर खरी गोष्ट आहे. अजूनच रॉयल रूपामध्ये येणार आहे, घाबरू नका. कशासाठी घाबरू नका? पहा, कोणताही शत्रू भले मग हरतो किंवा जिंकतो, तर त्याच्याकडे जी काही छोटी-मोठी अस्त्र-शस्त्र असतील ती युज करेल की नाही करणार? करणार ना? तर मायेचा सुद्धा शेवट तर होणार आहे परंतु जितका शेवट जवळ येत आहे, तितकी ती नवीन-नवीन रूपामध्ये आपली अस्त्र-शस्त्र युज करत आहे आणि करणार देखील. नंतर मग तुमच्या समोर नतमस्तक होईल. आधी तुम्हाला वाकविण्याचा प्रयत्न करेल, मग स्वतःच वाकेल. आज यामध्ये बापदादा फक्त एकच शब्द वारंवार अंडरलाइन करत आहेत. “बाप समान बनायचे आहे” - आपल्या या ध्येयाच्या स्वमानामध्ये रहा आणि सन्मान देणे अर्थात सन्मान घेणे, घेतल्याने मिळत नाही, देणे अर्थात घेणे आहे. मला सन्मान द्या - हे बरोबर नाहीये, सन्मान देणे हेच घेणे आहे. स्वमान बॉडी-कॉन्शसवाला नाही, ब्राह्मण जीवनाचा स्वमान, श्रेष्ठ आत्म्याचा स्वमान, संपन्नतेचा स्वमान. तर स्वमान आणि सन्मान घ्यायचा नाही परंतु देणे हेच घेणे आहे - या दोन गोष्टींमध्ये दृढता ठेवा. तुमच्या दृढतेला कोणी कितीही डळमळीत करेल, दृढतेला कमजोर होऊ देऊ नका. मजबूत करा, अचल बना. तर हे जे बापदादांना ६ महिन्यांचे प्रॉमिस केले आहे; प्रॉमिस तर लक्षात आहे ना. हे बघत बसू नका कि आता तर १५ दिवस पूर्ण झाले आहेत, साडेपाच महिने तर अजून बाकी आहेत. जेव्हा रुहरिहान (आत्मिक बातचीत) करता ना - अमृतवेलेला रुहरिहान तर करता, तर बापदादांना खूप छान-छान गोष्टी ऐकवता. आपण बोललेल्या गोष्टी तर जाणता ना? तर आता दृढतेला धारण करा. उलट्या गोष्टींमध्ये दृढता ठेवू नका. क्रोध करायचाच आहे, माझा दृढ निश्चय आहे, असे करू नका. का? आजकाल बापदादांपाशी रेकॉर्डमध्ये मेजॉरिटी क्रोधाच्या भिन्न-भिन्न प्रकारची रिपोर्ट पोहोचत आहे. मोठ्या रूपामध्ये कमी आहेत परंतु अंश रूपामधे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रोधाचे रूप जास्त आहे. यावर क्लास घ्या - क्रोधाची किती रूपे आहेत? आणि मग काय म्हणतात - ‘आमचा असा ना भाव होता, ना भावना होती, असेच बोलून गेलो’. यावर क्लास घ्या.

टीचर्स खूप आल्या आहेत ना? (१२०० टीचर्स आहेत) १२०० जणींनी जरी दृढ संकल्प केला तर उद्याच परिवर्तन होऊ शकते. मग इतके ॲक्सीडेंट (टकराव) होणार नाहीत, सगळेच वाचतील. टीचर्स हात वर करा. भरपूर आहेत. टीचर अर्थात निमित्त फाऊंडेशन. जर फाऊंडेशन पक्के अर्थात दृढ राहिले तर झाड तर आपोआपच ठीक होईल. आजकाल मग संसारामध्ये असो, किंवा ब्राह्मण संसारामध्ये असो प्रत्येकाला हिम्मत आणि खरे प्रेम हवे आहे. मतलबी प्रेम नको, स्वार्थी प्रेम नको. एक तर खरे प्रेम आणि दुसरी हिम्मत, समजा ९५ टक्के कोणी संस्कारवश, परवश होऊन वर-खाली जरी केले परंतु ५ टक्के चांगले केले, तरीही तुम्ही जर त्यांच्यातील ५ टक्के चांगलेपणा पाहून त्यांच्यामध्ये हिम्मत भरा की, ‘हे खूप छान केलेस, मग त्यांना म्हणा बाकी हे सुद्धा ठीक करा’, तर त्यांना वाईट वाटणार नाही. जर तुम्ही असे म्हणाल की, ‘असे का केले, असे थोडेच केले जाते, असे करायचे नसते’, तर बिचारा अगोदर संस्काराच्या अधीन आहे, कमजोर आहे, तर तो नर्व्हस होतो. प्रोग्रेस करू शकत नाही. अगोदर ५ परसेंटची हिम्मत द्या - ‘हि गोष्ट तुमच्यामध्ये खूप चांगली आहे. हे तुम्ही खूप चांगले करू शकता’, त्या नंतर त्याला वेळ आणि त्याच्या स्वरूपाला समजून गोष्टीला ठीक करायला सांगाल तर तो परिवर्तन करू शकेल. हिम्मत द्या, परवश आत्म्यामध्ये हिम्मत नसते. बाबांनी तुम्हाला कसे परिवर्तन केले? तुमची कमी-कमजोरी ऐकवली, तुम्ही विकारी आहात, तुम्ही खराब आहात, म्हटले? तुम्हाला स्मृती करून दिली तुम्ही आत्मा आहात आणि या श्रेष्ठ स्मृतीने तुमच्यामध्ये समर्थी (शक्ती) आली, परिवर्तन केले. तर हिम्मत देऊन स्मृती करून द्या. स्मृती, आपणच समर्थी देईल (समर्थ बनवेल). समजले. तर मग आता तरी समान बनाल ना? फक्त एक शब्द लक्षात ठेवा - फॉलो फादर-मदर. जे बाबांनी केले, ते करायचे आहे. बस्स. पावलावर पाऊल ठेवायचे आहे. तर समान बनणे सोपे वाटेल.

ड्रामा छोटे-छोटे खेळ दाखवत राहतो. आश्चर्याची मात्रा तर लावत नाही ना? अच्छा.

अनेक मुलांची ग्रीटिंग कार्ड्स, पत्रे, हृदयातील गाणी बापदादांपाशी पोहोचली आहेत. सर्वच म्हणतात - ‘आमची सुद्धा आठवण द्या, आमची सुद्धा आठवण द्या’. तर बाबा सुद्धा म्हणतात - ‘आमची सुद्धा प्रेमपूर्वक आठवण द्या’. आठवण तर बाबा सुद्धा करतात, मुले सुद्धा करतात, कारण या छोट्याशा संसारामध्ये आहेतच बाप-दादा आणि मुले आणखी विस्तार तर काहीच नाही. तर कोणाची आठवण येणार? मुलांना बाबांची आणि बाबांना मुलांची. तर देश-विदेशच्या मुलांना बापदादा सुद्धा खूप-खूप-खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. अच्छा.

चोहो बाजूच्या ब्राह्मण संसारातील विशेष आत्म्यांना, सदैव दृढतेद्वारे सफलता प्राप्त करणाऱ्या सफलतेच्या ताऱ्यांना, सदैव स्वतःला संपन्न बनवून आत्म्यांच्या हाकेला पूर्ण करणाऱ्या संपन्न आत्म्यांना, सदैव निर्बल असणाऱ्यांना, परवश असणाऱ्यांना आपल्या हिम्मतीच्या वरदानाद्वारे हिम्मत देणाऱ्या, बाबांच्या मदतीस पात्र आत्म्यांना, सदैव विश्व परिवर्तक बनून स्व परिवर्तनाने माया, प्रकृती आणि कमजोर आत्म्यांना परिवर्तन करणाऱ्या परिवर्तक आत्म्यांना, बापदादांचा चोहो बाजूच्या छोटयाशा संसारातील सर्व आत्म्यांना समोर आलेल्या श्रेष्ठ आत्म्यांना अरब-खरब पटीने प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
सायलेन्सच्या साधनांद्वारे मायेला दुरूनच ओळखून पळवून लावणारे मायाजीत भव

माया तर शेवटच्या क्षणापर्यंत येणार परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे दुरूनच पळवून लावणे. माया येईल आणि तुम्हाला डळमळीत करेल आणि मग तुम्ही पळवून लावाल, हा देखील वेळ वेस्ट गेला, म्हणून सायलेन्सच्या साधनांनी तुम्ही दुरूनच ओळखा कि हि माया आहे. तिला जवळ येऊ देऊ नका. जर विचार करता - ‘काय करू, कसे करू अजून तर पुरुषार्थी आहे…’ तर हा देखील मायेचा पाहुणचार करता, मग त्रस्त होता म्हणून दुरूनच ओळखून पळवून लावा तेव्हा मायाजीत बनाल.

सुविचार:-
श्रेष्ठ भाग्याच्या रेषेला इमर्ज कराल तर जुन्या संस्कारांच्या रेषा मर्ज होतील.