16-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - नेहमी हे लक्षात ठेवा की, आता बराच काळ लोटून गेला आहे आणि फार थोडाच वेळ उरला आहे; आता तर घरी जायचे आहे, या घाणेरड्या शरीराला आणि दुनियेला विसरून जायचे आहे”

प्रश्न:-
असा कोणता नशा जर निरंतर राहिला तर स्थिती एकदम फर्स्टक्लास होईल?

उत्तर:-
हा नशा निरंतर रहावा की, ‘मिरुआ मौत मलुका शिकार’ (प्राण्याचा जीव जातो, परंतु शिकारी खूष होतो). आपण शिकारी (फरिश्ता) बनून माशुक सोबत घरी जाऊ, बाकी सर्व नष्ट होणार आहे. आता आम्ही ही जुनी खाल (शरीर) सोडून नवीन घेणार. हे ज्ञान पूर्ण दिवस बुद्धीमध्ये टपकत राहिले तर अपार आनंद होईल. स्थिती फर्स्टक्लास बनेल.

गीत:-
यह कौन आज आया...

ओम शांती।
हे कोणी म्हटले? मुलांनी. अतींद्रिय सुखमय जीवनामध्ये येऊन म्हणतात - ‘बेहदचे बाबा आले आहेत’. कशाकरिता? या पतित दुनियेला परिवर्तित करून पावन दुनिया बनविण्याकरिता. पावन दुनिया किती मोठी असेल आणि पतित दुनिया किती मोठी आहे, हे तुम्हां मुलांच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे. इथे किती करोडो मनुष्य आहेत. याला पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हणतात. गोड-गोड मुलांच्या मनामध्ये आले पाहिजे - आपली नवीन दुनिया किती छोटी असेल. आपण तिथे कसे राज्य करणार. आपल्या भारतासारखा दुसरा कोणताही देश असू शकत नाही. हे कोणालाही समजत नाही की, भारत स्वर्ग होता, त्याच्यासारखा दुसरा कोणता देश असूच शकत नाही. तुम्हाला आता हे कळते आहे की, हा भारत तर आता काहीच कामाचा राहिलेला नाही. भारत स्वर्ग होता, आता नाहीये. हे कोणालाच आठवत नाहीये की, आपला भारत सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात प्राचीन आहे. तुम्हां मुलांच्या बुद्धीमध्ये येते, ते देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार. इतका आनंद, इतका आदर वाटतो का? बेहदचे बाबा आलेले आहेत, कल्प-कल्प येतात. माया रावणाने आमचे जे राज्य-भाग्य हिसकावून घेतले आहे, ते बाबा येऊन आमचे राज्य-भाग्य पुन्हा आम्हा आत्म्यांना देतात. असे नाही की, काही युद्ध करून हिरावून घेतले गेले आहे. नाही. रावण राज्यामध्ये आमचे मत भ्रष्टाचारी बनते. श्रेष्ठाचारी असणारे आपण भ्रष्टाचारी बनतो. दुनियेचा बघा किती विस्तार झाला आहे, आपला भारत देश किती छोटा होता. स्वर्गामध्ये किती सुखी असाल. हिरे-माणकांचे महाल असतील. तिथे रावण असत नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आनंद भरून राहिला पाहिजे, अतींद्रिय सुख असले पाहिजे.

बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. देहाचे भान तोडण्यासाठी बाबांनी, ब्रह्मा बाबांना सांगितले होते - १०८ ठिगळे लावलेले कपडे घाल. भले प्रतिष्ठीत व्यक्तींशी, मोठ्या सोनारांसोबत कनेक्शन होते, ती घमेंड नाहीशी कशी होणार! देही-अभिमानी बनावे लागेल. मी आत्मा आहे, हे तर जुने शरीर आहे. याला सोडून फर्स्टक्लास शरीर घ्यायचे आहे. साप देखील एक कातडी सोडून दुसरी घेतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे की, ही जुनी कातडी सोडून आपण दुसरी नवीन घेणार, मग दुसरे शरीर मिळेल. हे सारे ज्ञान तर मुलांच्या बुद्धीमध्ये टपकत राहिले पाहिजे. ही तर घाणेरडी दुनिया आहे, हिला बघत असताना देखील बुद्धीने विसरावे लागते. आम्ही यात्रेला जात आहोत, आमचा बुद्धियोग घराकडे जात आहे. अभ्यास तर करावा लागेल ना. हे शरीर देखील जुने आहे, दुनिया सुद्धा जुनी आहे. साक्षात्कार केला आहे, आता हा देह आणि देहाची सर्व नाती सोडून घरी जायचे आहे. आतून आनंद होतो, आता आपल्याला परत जायचे आहे. बुद्धियोग तिथे लावायचा असतो. एकमेकांना हेच ऐकवायचे आहे - मनमनाभव. हा खूप जबरदस्त मंत्र आहे. भले गीता तर खूप जण वाचतात परंतु अर्थ समजत नाहीत. जशी इतर शास्त्रे वाचतात, तशी गीता वाचतात. हे कोणाच्याच बुद्धीमध्ये येणार नाही की, आम्ही भविष्यासाठी राजयोग शिकत आहोत. खूप काळ लोटला आहे, आता फार थोडाच वेळ उरला आहे. अशा प्रकारे स्वतःचे मनोरंजन करत, आनंदी रहायचे आहे. हे तर सर्व नष्ट होणार आहे. ‘मिरूआ मौत, मलूका शिकार’. आपण मलूक बनून आपल्या माशूक सोबत घरी जाणार. हे आत्म्यांचे बाबा बसून शिकवत आहेत. दिसायला सामान्य असले तरी ते सर्वश्रेष्ठ आहेत. बाबा आले आहेत बेहदचा वारसा देण्याकरिता, कल्प-कल्प येतात. ही तर घाणेरडी दुनिया आहे. अशा प्रकारे गोष्टी करायच्या असतात. याला म्हटले जाते - विचार सागर मंथन. ही शास्त्रे इत्यादी तर जन्म-जन्मांतर वाचली आहेतच, आपण भारतवासीयांनी जितके जप-तप इत्यादी केले आहे तितके इतर कोणीही केलेले नाही. जे सर्वप्रथम आलेले असतील त्यांनीच भक्ती केली आहे आणि मग तेच ज्ञान-योगामध्ये देखील वेगाने पुढे जातील कारण त्यांना मग परत पहिल्या नंबरमध्ये यायचे आहे. तुम्ही बघता, काहीजण तर खूप चांगला पुरुषार्थ करतात.

तुम्ही मुले जी ह्या रूहानी सेवेमध्ये व्यस्त आहात, त्यांच्यासाठी तर खूप चांगले आहे. खरोखरच भट्टीमध्ये बसले आहेत. ते नाते अतूट झाले आहे आणि जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात, हे ऐकतात आणि ऐकवतात तर ते जुने असलेल्यांपेक्षाही वेगाने जात आहेत. असे दिसून येते की नवीन येणारे खूप वेगाने पुढे जातात. तुम्ही लिस्ट जर काढाल तर कळेल. अगदी सुरुवातीला तुमची माळा बनवत होते, मग बघितले की किती चांगली-चांगली मुले ३-४ नंबरवर असणारी देखील निघून गेली. एकदम प्रजेमध्ये जाऊन पडली. आता तुमचे हे स्टुडंट लाईफ आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून एकीकडे हा कोर्स शिकता. खूप मुले डबल कोर्स करतात, तर लिफ्ट मिळते. तुमचा कोर्स आहे - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून हे शिकणे. यामध्ये कन्या खूप वेगाने गेल्या पाहिजेत. कन्यांमुळे ‘कन्हैय्या’ किंवा ‘गोपाळ’ नांव देखील गायले गेले आहे. गोप देखील आहेत कारण प्रवृत्ती मार्ग आहे ना! तुम्ही सतयुगामध्ये देवी-देवता धर्माचे होता. हे लक्ष्मी-नारायण प्रवृत्ती मार्गामध्ये राज्य करत होते. हे तुमच्या बुद्धीमध्ये टपकत राहिले पाहिजे की, आपण काय बनत आहोत! देवता किती फर्स्ट क्लास आहेत! त्यांच्या समोर जाऊन महिमा गातात - ‘तुम्ही सर्व गुण संपन्न, १६ कला संपूर्ण…’, ‘आम्ही पापी, कपटी आहोत’. ‘हम निर्गुण हारे में कोई गुण नाहीं’. आता यामध्ये भगवंताला काही तुमच्यावरती दया अथवा कृपा करण्याची गरज नाही. वास्तविक दया अथवा कृपा आपणच स्वतःवर करायची असते. तुम्हीच देवता होता, आता काय बनले आहात ते जरा स्वतःला पहा आणि मग पुरुषार्थ करून देवता बना. श्याम पासून सुंदर (पतितापासून पावन) बनण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. हे तर भक्तीमार्गामध्ये म्हणतात - मरणारच होतो परंतु अमक्याची कृपा झाली आणि वाचलो, त्यांच्या आशीर्वादाने वाचलो. महात्मा इत्यादींचे हात पकडून म्हणतील, तुमचा आशीर्वाद पाहिजे. इथे तर हे शिक्षण आहे. कृपा इत्यादीचा प्रश्नच नाही. ‘मनमनाभव’चा काही अर्थ तर आहे ना. मंत्र तर खूप देतात, अनेक प्रकारचे हठयोग शिकवतात. प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास असतो. हठयोगाचे उदाहरण बघायचे असेल तर जयपूरच्या म्युझियम मध्ये जाऊन पहा. इथे तर तुम्ही किती आरामात बसला आहात. बुद्धीमध्ये आहे आपल्याला पुन्हा बाबा राज्य देत आहेत. तिथेच अद्वैत देवी-देवता धर्म होता, इतर कोणताही धर्म नव्हता. टाळी दोन हातानेच वाजते. एक धर्म आहे तर मग मारामारी होत नाही. आता आहे कलियुग. कलियुग पूर्ण होईल तेव्हा भक्ती देखील पूर्ण होईल. आता तर लोकसंख्या किती वाढत चालली आहे. भारताच्या धरणीचा विस्तार होत नाही, धरणी तर तेवढीच आहे. बाकी लोकसंख्या कमी-जास्त होते. तिथे (सतयुगामध्ये) मनुष्य फार थोडे असतील, दुनिया तर हीच असेल. दुनिया काही छोटी होणार नाही. तर तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाबांच्या श्रीमतानुसार आपण योगबलाने आपले राज्य स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’ तर तुमची पापे भस्म होतील. आत्म्यामध्येच भेसळ पडली आहे ना. फक्त म्हणतात - ‘सतो, रजो, तमो…’ परंतु हे दाखवत नाहीत की आत्म्यामध्येच भेसळ पडते. पहिले गोल्डन एज्ड होते, आत्मा प्युअर सोने होते, मग त्यामध्ये चांदी पडते, त्यांना मग सिल्वर एज्ड म्हटले जाते अर्थात चंद्रवंशी. इंग्रजी शब्द किती सुंदर आहेत. गोल्डन, सिल्व्हर, कॉपर आणि आयर्न. बाबा समजावून सांगत आहेत - आत्म्यामध्ये भेसळ पडली आहे, ती मग निघणार कशी. सतो पासून तमो बनली आहे मग तमोपासून सतो कशी बनणार. समजतात की, गंगेमध्ये स्नान केल्याने सतोप्रधान बनू. परंतु असे होऊ शकत नाही. गंगा-स्नान इत्यादी तर रोज करत असतात. काहीजण तर नियमित करत असतात. नाल्यामध्ये जाऊन देखील स्नान करतात. तुम्हाला बाबा म्हणतात - बाबांची आठवण करण्याचा हा नियम करा. आठवणीचे स्नान अथवा यात्रा करा. ज्ञान-स्नान देखील घालतात आणि योगाची यात्रा शिकवतात. बाबा ज्ञान देतात. यामध्ये योगाचे देखील ज्ञान आहे आणि सृष्टी-चक्राचे देखील ज्ञान आहे. बाकी शास्त्रांचे ज्ञान तर पुष्कळ जण देतात परंतु योगाला जाणतच नाहीत. या शास्त्रांच्या ज्ञानालाच हठयोग समजले आहेत. योग-आश्रम तर पुष्कळ आहेत. ‘मनमनाभव’चा मंत्र सुद्धा देतील; परंतु बाबांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मनुष्याकडे हे ज्ञानच नाहीये. आता ८४ जन्मांचे चक्र पूर्ण झाले आहे. आता पुन्हा नवीन दुनिया निर्माण होईल.

झाडाची वृद्धी कशी होते हे तुमच्याच बुद्धीमध्ये आहे. ही राजाई स्थापन होत आहे, सगळेच काही एकत्र थोडेच जातील. ब्राह्मणांचे झाड खूप मोठे होईल. मग थोडे-थोडे करून जातील. प्रजा तयार होत राहील. थोडेजरी कोणी ऐकले तरी ते प्रजेमध्ये येतील. सेंटर्सची वृद्धी होत जाईल. जिथे-तिथे मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी होत राहतील. जशी छोटी-छोटी मंदिरे बांधली जातात, तशी तुमची प्रदर्शनी देखील गावा-गावांमध्ये होईल. घरा-घरांमध्ये प्रदर्शनी ठेवावी लागेल. वृद्धी होत जाईल त्यामुळे शेवटी मोठ्याप्रमाणात ही चित्रे छापून घ्यावी लागतील. सर्वांपर्यंत हा बाबांचा संदेश पोहोचला पाहिजे. तुम्हा मुलांना खूप मोठी सेवा करायची आहे. आता हे प्रोजेक्टर, प्रदर्शनीची फॅशन निघाली आहे तर गावा-गावामध्ये दाखवावी लागेल. ते (गावातील गरीब लोक) चांगल्या रीतीने शिकून घेतील. शिवजयंती गायली जाते परंतु ते कसे येतात, हे कोणालाच ठाऊक नाही. शिव-पुराण इत्यादीमध्ये या गोष्टी दिलेल्या नाहीत. या गोष्टी तुम्हीच ऐकता. ऐकते वेळी चांगले वाटते आणि मग विसरून जातात. जर हे पॉईंट्स चांगल्या रीतीने धारण होतील तर सेवा देखील चांगल्या प्रकारे करू शकाल. परंतु सर्वच पॉईंट्स काही कोणाला धारण होत नाहीत. भाषण करून येतील आणि मग लक्षात येईल की, अजून हा पॉईंट देखील समजावून सांगितला असता तर चांगले झाले असते; ज्यांना देह-अभिमान नसेल ते हे ताबडतोब कबूल करतील. भाषण करून झाल्यावर मग विचार करतील - आपण सर्व पॉईंट्स व्यवस्थित समजावून सांगितले आहेत ना? अजून हा पॉईंट विसरलो आहोत; हे ज्ञानाचे पॉईंट्स काही सोबत येणार नाहीत. हे फक्त आत्तासाठी आहेत. नंतर मग हे नष्ट होईल. या डोळ्यांनी जे काही आता बघत आहात ते मग सतयुगामध्ये असणार नाही. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्ता मिळतो आहे. आता तुम्ही त्रिनेत्री बनता. बाबा येऊन तुम्हाला हे ज्ञान देत आहेत, जे आत्मा धारण करत आहे. आत्म्याला तिसरा नेत्र मिळतो. हे ज्ञान कोणालाच नाहीये की, ‘मी आत्मा आहे. या शरीराद्वारे हे कर्म करत आहे’. बाबा आपल्याला शिकवत आहेत, हे लक्षात ठेवणे - यामध्येच मेहनत आहे. मुलांनी मेहनत केली पाहिजे आणि आनंदात राहिले पाहिजे. बस्स, आता आपले राज्य आले की आले. तुम्ही जाणता आपल्या राज्यामध्ये काय-काय असेल. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे की आपण या शिक्षणाद्वारे राज्य प्राप्त करतो. शिकणाऱ्याला आपले पद लक्षात राहते. आपण शिकतो भविष्याकरिता. चांगले शिकलो तर सिंहासनावर बसू. जे सिंहासनावर बसणारे असतील ते प्रसिद्ध होतात. आता जर लिस्ट काढली, माळा बनवली तर सर्व जण म्हणतील - ‘अमक्या कन्येला आमच्याकडे पाठवा, रिफ्रेश करण्यासाठी’. भाषण करणाऱ्यांना बोलावतात, तर त्यांचा आदर देखील ठेवला पाहिजे. आपल्याला यांच्यासारखे हुशार बनायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अतींद्रिय सुखाचा अनुभव करण्याकरिता देहाच्या भानाला नष्ट करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आता परत घरी जायचे आहे त्यामुळे बुद्धीयोग घरासोबत लागलेला असावा.

२) गृहस्थ व्यवहारामध्ये राहून शिक्षणही घ्यायचे आहे, डबल कोर्स करायचा आहे. ज्ञानाचे स्नान आणि आठवणीची यात्रा स्वतः देखील करायची आहे आणि इतरांकडूनही करवून घ्यायची आहे.

वरदान:-
कोमलतेला आश्चर्यामध्ये परिवर्तन करून मायाजीत बनणारे शक्तीस्वरूप भव

शक्तीस्वरूप बनण्यासाठी कोमलतेला आश्चर्यामध्ये परिवर्तित करा. फक्त स्वतःच्या संस्कारांना परिवर्तन करण्यामध्ये कोमल बना, कर्मामध्ये कधीही कोमल बनू नका, यामध्ये मात्र शक्ती-रूप बनायचे आहे. जे शक्ती रूपाचे कवच धारण करतात त्यांना मायेचा कोणताही तीर लागू शकत नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यामधून, नयन-चैन मधून (डोळ्यांमधून आणि चेहऱ्यावरील हावभावा वरून) कोमलते ऐवजी शक्ती-रूप दिसून यावे तेव्हाच मायाजीत बनून पास विद् ऑनरचे सर्टिफिकेट घेऊ शकाल.

बोधवाक्य:-
त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होऊन प्रत्येक कर्म करा तर मग माया दुरूनच पळून जाईल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

जसे साकार बाबांनी अथक आणि एकरस स्थितीचे उदाहरण बनून दाखवले, तसे तुम्हा मुलांना देखील इतरांसमोर उदाहरण बनायचे आहे, हीच सेवा आहे. सेवा केवळ वाणीनेच होत नाही, स्थितीद्वारे देखील सेवा होते. तर समयानुसार आता आपली स्थिती एकरस बनवा.