20-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमच्याकडे अविनाशी ज्ञान रत्नांचा अथाह खजिना आहे, तुम्ही त्याचे दान करा, तुमच्या दारातून कोणीही परत जाता कामा नये”

प्रश्न:-
सर्व नात्यांचे सॅकरिन बाबा आपल्या मुलांना कोणते श्रीमत देतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, आपला बुद्धियोग इतर सर्व गोष्टींमधून काढून फक्त माझीच आठवण करत राहा. दुनियेतली कोणतीही वस्तू, मित्र, नातेवाईक इत्यादी कोणाचीच आठवण येऊ नये, कारण यावेळी सगळेच दुःख देणारे आहेत. विश्वाचा मालक बनायचे असेल तर ६३ जन्मांचा हिशोब चुकता करण्याची मेहनत करावी लागेल. सर्व काही विसरून अशरीरी बना तेव्हाच हिशोब चुकता होईल. मी सर्व नात्यांचे सॅकरिन आहे.

ओम शांती।
बापदादा मुलांना विचारत आहेत की, कोणाच्या आठवणीत बसला आहात? (शिवबाबांच्या) मोठ्या जोरदार आवाजात म्हटले पाहिजे - शिवबाबांच्या आठवणीत बसलो आहोत. तुम्हा मुलांचे अर्थात आत्म्यांचे कनेक्शन शिवबाबांसोबत आहे. तुम्ही शिवबाबांचे बनता यांच्याद्वारे (ब्रह्माबाबांद्वारे) कारण शिवबाबा यांच्याद्वारेच भेटतात. यांना (ब्रह्मा बाबांना) मधले दलाल देखील म्हटले जाते. तुमचे दलालाशी काहीही कनेक्शन नाही. हे तर केवळ मध्यस्थ आहेत. सर्वांचा घेण्या-देण्याचा हिशोब बाबांशी होणार आहे, यांच्यासोबत नाही. यांचे देखील घेणे-देणे बाबांसोबत आहे. हे देखील त्या बाबांना म्हणतात - ‘बाबा, माझे सर्व काही तुमचे आहे’. तुम्हाला देखील एक तर हा निश्चय आहे की, आम्ही आत्मा आहोत आणि दुसरा हा देखील निश्चय आहे की आम्ही आत्मे आता परमपिता परमात्म्याकडून वारसा घेत आहोत. मनसा-वाचा-कर्मणा, तन-मन-धनाने आम्ही बाबांचे मदतगार बनतो. हे सर्व काही शिवबाबांना अर्पण केले आहे. मग शिवबाबा डायरेक्शन देतात - असे-असे हे करा. याला म्हटले जाते - श्रीमत.

बाबा स्वतः सांगतात - मी या जुन्या तनामध्ये प्रवेश करतो. हे देखील पतितापासून पावन बनत आहेत. हे कोणी म्हटले? शिवबाबांनी. हे देखील पावन बनत आहेत. यांचा देखील माझ्यासोबत हिशोब आहे. यांच्याशी कोणाचाच हिशोब नाही. तुम्ही चिठ्ठी लिहिता - ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’. परंतु माया अशी आहे की निरंतर आठवण करू देत नाही. बुद्धियोग वारंवार तोडून टाकते. जर हाच पक्का पुरुषार्थ कराल तर मग बाकीचे सर्व काही विसरून जाल. स्वतःचे शरीर देखील विसरून जाल. हे शरीर असेल, परंतु आत्म्याला या सर्व गोष्टींचा तिटकारा वाटू लागेल. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. अखेरीस, आपल्याला आपल्या शरीराची देखील आठवण राहू नये. बाबा म्हणतात - स्वतःला अशरीरी समजून मज पित्याची आठवण करा. मी सदैव अशरीरी आहे, तुम्ही देखील अशरीरी होता. मग तुम्ही पार्ट बजावला. आता पुन्हा तुम्हाला पार्ट बजावायचा आहे, ही मेहनत आहे. विश्वाचा मालक बनणे काही छोटी गोष्ट आहे का! मनुष्यच विश्वाचा मालक बनू शकतो. या देवता देखील मनुष्य आहेत, परंतु त्यांना दैवी गुणवाले देवता म्हटले जाते. लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते, त्यांना आपली मुले असतील. तीच त्यांना आई-वडील मानतील. परंतु आजकाल मनुष्य अंधश्रद्धेने या लक्ष्मी-नारायणाला ‘त्वमेव माताश्च पिता…’ म्हणतात. वास्तविक ही महिमा आहे शिवबाबांची. देवतांची महिमा गातात - सर्वगुण संपन्न… परंतु त्यांची पूजा का करतात हे कोणालाही माहिती नाही. आता तुम्ही काही अशी महिमा गाणार नाही की, ‘तुम मात-पिता...’ हो, तुम्ही जाणता शिवबाबा ते निराकार परमपिता परमात्मा आहेत. त्यांच्याकडूनच भरभरून सुख मिळते. बाकी जे पण नातेवाईक इत्यादी आहेत त्यांच्याकडून दुःखच मिळते. हे (शिवबाबा) तर एक सॅकरिन आहेत, ज्यांच्याकडून सर्व नात्यांची रसना मिळते (आनंद मिळतो). म्हणून बाबा म्हणतात - काका, मामा, चाचा इत्यादी सर्वांमधून बुद्धियोग काढून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तुम्ही गाता देखील - ‘दुःख हर्ता सुखकर्ता… सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत, तेच आमचे सर्व काही आहेत’. लौकिक पित्याकडूनही दुःखच मिळते. बाकी टीचर आहेत जे कोणालाही दुःख देत नाहीत. टीचरकडे जाऊन शिकल्यामुळे तुम्ही उदरनिर्वाह करता. कला शिकविणारे देखील असतात. ते सर्व अल्पकाळासाठी शिकवतात. भक्तीमध्ये देखील महिमा एका रामाची अथवा परमपिता परमात्म्याचीच करतात, त्यांचीच आठवण करतात. खरेतर भक्ती देखील एकाचीच करायची आहे. ते एकच तुम्हाला पूज्य बनवतात. तुम्ही सर्वप्रथम एका शिवबाबांची पूजा करता. त्याला सतोप्रधान भक्ती म्हटले जाते. मग आत्मा देखील सतोप्रधानापासून सतो, रजो, तमो बनते. तुम्ही समजता आपण पुजारी बनतो. तुम्ही सुरुवातीला एका शिवाचीच पूजा करता नंतर मग कला कमी होत जातात. भक्ती देखील सतोप्रधानापासून सतो, रजो, तमो बनते. संपूर्ण ड्रामा तुमच्यावरच बनलेला आहे. आपेही पूज्य आपेही पुजारी, जे पूर्ण ८४ जन्म घेतात, त्यांचीच कहाणी आहे. त्यांनाच बाबा बसून सांगतात की, तुम्ही ८४ जन्म कसे घेतले. हिशोब त्यांचाच आहे. जे सुरुवातीला पूज्य देवी-देवता बनतात, तेच नंतर पुजारी बनतात.

बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येऊन तुम्हाला शिकवतो आणि देवी-देवता धर्माची स्थापना करतो, राजयोग शिकवतो. भगवान तर एकच आहेत. ते (दुनियावाले) तर म्हणतात - ‘दगडा-मातीत, कणा-कणामध्ये परमात्मा आहे’. परंतु असे तर होऊ शकत नाही. भगवंताची तर महिमा अपरंपार आहे. म्हणतात - ‘ओ बाबा, तुमची गति मत न्यारी आहे, अर्थात तुमचे जे श्रीमत मिळते ते सर्वात न्यारे आहे’. बाबांना म्हणतातच मुळी - गती-सद्गती दाता परमपिता परमात्मा, तर बुद्धी वर परमधाममध्ये जाते. दुःखाच्या वेळी त्यांची आठवण येते. बुद्धीमध्ये जर राम-सीता असतील तर मग सर्व रामायण बुद्धीमध्ये येईल. तुम्ही तर बोलावताच त्या एका बाबांना. एका बाबांव्यतिरिक्त कोणत्याही साकारी मनुष्यासोबत अथवा आकारी देवतांशी बुद्धी जोडायची नाही. पतित-पावन आहेतच एक बाबा. कोणत्याही सत्संगामध्ये जाऊन हेच गीत गातात - ‘पतित-पावन सीताराम’, अर्थ काहीच नाही. हे सर्व आहे भक्तिमार्गाचे गायन. सर्व रावणाच्या जेलमध्ये आहेत. भक्तिमार्गामध्ये खूप भटकतात. इथे भटकण्याचा काही प्रश्नच नाही. बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, बुद्धीमध्ये पॉईंट्स चांगल्या प्रकारे धारण करायचे आहेत. नियमितपणे अभ्यास करायचा आहे. जर कोणत्या कारणाने सकाळी मुरलीला येऊ शकत नसलात तर दुपारी आले पाहिजे. कोणाला त्रासही द्यायचा नाही. पूर्ण दिवस पडला आहे. कोणत्याही वेळेला जाऊन मुरली वाचायची आहे. या मुली (टीचर बहिणी) सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवेवर आहेत. पूर्ण दिवस सेवा केंद्रे उघडी आहेत. कोणीही आले तर त्यांना मार्ग दाखवायचा आहे. सर्वात पहिले तर हे सांगायचे आहे की, ‘विचार करा, तुम्हाला दोन पिता आहेत. दुःखामध्ये पारलौकिक पित्याची आठवण करता ना’. आता शिवबाबा म्हणतात, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मृत्यू तर समोर उभा आहे. हे तेच महाभारत युद्ध आहे. भले मोठे पद्मपती, करोडपती आहेत, मोठ-मोठे बंगले इत्यादी बनवतात. परंतु ते राहणार थोडेच आहेत, हे सर्व उध्वस्त होणार आहेत. ते समजतात - कलियुगाचे आयुष्य लाखो वर्षांचे आहे. याला म्हटले जाते घोर अंध:कार. कोणाकडे पैसे असतात तर विचारतात - ‘बाबा, घर बांधू’. बाबा म्हणतील - पैसे आहेत तर भले बांधा. पैसे सुद्धा मातीतच तर मिसळून जाणार आहेत. हे तर सर्व तात्पुरते आहे. नाहीतर हे सर्व पैसे देखील नष्ट होतील. काहीही शिल्लक राहणार नाही, भले बनवा. मग त्याच्यामध्ये गीता पाठशाळेचा प्रबंध करा. जेणेकरून कोणीही तुमच्या दारात येईल त्याला अशी भिक्षा द्या की त्यांना एकदम विश्वाचा मालक बनवा. तुमच्याकडे अगणित ज्ञान-धन आहे, इतके कोणाकडेच नाहीये. तुमच्यामध्ये सर्वात श्रीमंत ते आहेत, ज्यांच्याकडे भरपूर ज्ञान-रत्ने बुद्धीमध्ये भरलेली आहेत. कोणीही आले तर तुम्ही त्यांची झोळी भरा. तुमच्याकडे इतका खजिना आहे. फक्त हा बोर्ड लावा - या, आलात तर आम्ही तुम्हाला सदैव सुखी अशा स्वर्गाचा वारसा प्राप्त करण्याचा मार्ग दाखवू. परंतु मुलांमध्ये तो नशा टिकून राहत नाही. इथे नशा चढतो, बाहेर गेल्यावर विसरून जातात. आवड असायला हवी. कोणी जरी आले तर त्यांना मार्ग सांगा, ज्यामुळे त्यांचा बेडा (जीवन नौका) पार होईल. तुमच्याकडे खूप मौल्यवान धन आहे. कोणीही भिकारी येवो अथवा लक्षाधीश येवो, तुम्ही त्यांना देखील ज्ञान रत्नांनी भरपूर करू शकता. बाबा इथे नशा चढवतात आणि नंतर सोडावॉटर प्रमाणे स्थिती होते. बाबा तुमची झोळी अविनाशी ज्ञान रत्नांनी भरतात. परंतु नंबरवार आहेत. ज्यांच्या नशिबात आहे तेच पूर्ण रीतीने धारण करतात. बाबा म्हणतात - प्रयत्न करून तुम्ही निरंतर आठवणी मध्ये रहा. असे नाही की सेंटरवर जाऊन एका जागी बसायचे आहे. नाही, चालता-फिरता जो काही वेळ मिळेल त्यात बाबांची आठवण करत राहायचे आहे. ‘हथ कार डे, दिल यार डे’ (हाताने काम करताना, हृदय अर्थात बुद्धियोग बाबांसोबत असावा). बाबांच्या आठवणीने तुमचे खूप कल्याण होईल. २१ जन्मांसाठी तुम्ही श्रीमंत बनता. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देतात. भारत स्वर्ग होता. आता नरक आहे.

बाबा म्हणतात - आता माझी आठवण करा तर तुमची आत्मा सतोप्रधान बनेल. बाबांची आठवण कराल तर नशा चढेल. आमच्यासारखे धनवान सृष्टीमध्ये कोणीही नाही. बाबाच जर आठवले नाहीत तर संपत्ती कुठून येईल. स्वर्गात तर तुम्हा मुलांना अपार सुख मिळते. शास्त्रांमध्ये तर किती दंतकथा लिहून ठेवल्या आहेत. गातात देखील - ‘राम राजा, राम प्रजा… धर्म का उपकार है।’. आणि मग म्हणतात, रामाची सीता चोरली गेली, वानरांची सेना घेतली… पूर्वी हे (ब्रह्मा बाबा) स्वतः देखील वाचत होते, परंतु काहीही समजत नव्हते. आता बऱ्याच गोष्टी समजत आहेत. किती आश्चर्यकारक गोष्टी लिहिल्या आहेत. बाबा म्हणतात - मला प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. त्रिमूर्तीमध्ये देखील ब्रह्मा, विष्णू, शंकर दाखवतात. परंतु हे देखील समजत नाहीत की विष्णू कोण आहेत? कुठे राहणारे आहेत? विष्णूच्या मंदिराला नर-नारायणाचे मंदिर म्हणतात, परंतु अर्थ काहीही समजत नाहीत. विष्णूची ही दोन रुपे लक्ष्मी-नारायण आहेत, जे सतयुगामध्ये राज्य करत होते. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. कोणीही आले तर सांगा - हे ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. तर प्रजापिता ब्रह्मा सर्वांचा पिता आहे. अतिशय भरपूर प्रजा आहे. नाव तर ऐकले आहे ना? भगवंताने ब्रह्मा द्वारे ब्राह्मण रचले. बाबांनी जरूर मुलांना वारसा तर दिला असेल ना. तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनवतात. तुम्ही शिवबाबांकडून वारसा प्राप्त करता. एक आहेत लौकिक पिता, दुसरे आहेत पारलौकिक पिता. आता हे (ब्रह्मा बाबा) तुम्हाला अलौकिक पिता मिळाले आहेत, हे तर हिऱ्यांचे व्यापारी होते. हे थोडेच काही माहीत होते? यांच्यासाठी (ब्रह्मा बाबांसाठी) म्हणतात की, यांच्या अनेक जन्मांच्या अंतीम जन्मामध्ये देखील अंताला यांच्यामध्ये प्रवेश मी करतो. वानप्रस्थी बनण्याचा रिवाज देखील भारतातच आहे. साठी नंतर गुरूकडे निघून जातात. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून म्हणतात - ‘आता तुम्हाला घरी यायचे आहे’. मुक्ती सर्वांना हवी आहे, परंतु मुक्ती विषयी कोणीही जाणत नाहीत. ब्रह्ममध्ये लीन तर कोणीही होऊ शकत नाही. हे सृष्टीचे चक्र तर फिरतच राहते, सर्वांना पार्ट बजावायचाच आहे. म्हणतात - जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो. हा अनादि ड्रामा बनलेला आहे. ८४ जन्मांचा पार्ट तुम्हाला बजावायचाच आहे. हा ज्ञान डान्स होतो. ते लोक मग डमरू दाखवतात. आता सूक्ष्मवतनवासी शंकर डमरू कसा काय वाजवेल?

बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही वानराप्रमाणे होता. तर तुम्हा वानरांची सेना घेतली. तुमच्या समोर बाबा ज्ञानाचा डमरू वाजवत आहेत. तुम्हाला ज्ञान देत आहेत. आता तुमचा चेहरा आणि स्वभाव दोन्ही परिवर्तित करत आहेत. काम-चितेवर बसून तुम्ही काळे बनला आहात. तर मग बाबा तुम्हाला ज्ञान-चितेवर बसवून चेहरा आणि स्वभाव दोन्ही परिवर्तित करून सावळ्यापासून गोरे बनवतात. इथे बाबा किती नशा चढवतात, तर मग नशा गायब का व्हायला पाहिजे? अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांनी जे अथाह ज्ञान धन दिले आहे, ते धारण करून स्वतः देखील श्रीमंत बनायचे आहे आणि सर्वांना दानही करायचे आहे. जो कोणी येईल त्याची झोळी भरायची आहे.

२) बाबांच्या आठवणीद्वारेच कल्याण होणार आहे, त्यामुळे जितके शक्य असेल चालता-फिरता बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. सर्व नात्यांचा आनंद एका बाबांकडूनच घ्यायचा आहे.

वरदान:-
सतत बिझी राहण्याच्या विधी द्वारे व्यर्थ संकल्पांची तक्रार समाप्त करणारे संपूर्ण कर्मातीत भव

संपूर्ण कर्मातीत बनण्यामध्ये व्यर्थ संकल्पांची वादळेच विघ्न टाकतात. या व्यर्थ संकल्पांच्या तक्रारीला समाप्त करण्यासाठी आपल्या मनाला सतत बिझी ठेवा, वेळेला बुकिंग करण्याची पद्धत शिका. पूर्ण दिवसभरामध्ये मनाला कुठे-कुठे बिझी ठेवायचे आहे - त्याचा प्रोग्राम बनवा. रोज आपल्या मनाला चार गोष्टींमध्ये बिझी करा: (१) मिलन (रूहरिहान), (२) वर्णन (सेवा), (३) मगन (मग्न अवस्था) आणि (४) लगन (समर्पण). यामुळे वेळ सफल होईल आणि व्यर्थची तक्रार नष्ट होईल.

बोधवाक्य:-
सफलतेला परमात्म बर्थ-राईट (जन्मसिद्ध अधिकार) समजणारेच सदैव प्रसन्नचित्त राहू शकतात.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

सरळता आणण्यासाठी फक्त एका गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपली स्थिती स्तुतीच्या आधारावर असू नये. बरीच मुले कर्तव्याच्या फळाची इच्छा खूप ठेवतात, त्यामुळे जेव्हा स्तुती होत नाही तेव्हा स्थिती डगमग होते. निंदा होते तर अनाथ बनतात. आपली स्टेज सोडून धनीला सुद्धा (बाबांना सुद्धा) विसरून जातात, त्यामुळे स्तुतीच्या आधारावर स्थिती अवलंबून ठेवू नका.