25-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - स्वतःला विचारा की मी कर्मेंद्रियाजीत बनलो आहे, कोणतेही कर्मेंद्रिय मला धोका तर देत नाही ना!”

प्रश्न:-
कर्मातीत बनण्याकरिता तुम्हा मुलांना स्वतःशीच कोणती प्रतिज्ञा करायची आहे?

उत्तर:-
स्वतःशी प्रतिज्ञा करा की, कोणतेही कर्मेंद्रिय कधीही चंचल होणार नाही. मला माझी कर्मेंद्रिये वशमध्ये करायची आहेत. बाबांनी जी पण डायरेक्शन्स दिली आहेत, त्यांना अंमलात आणायचेच आहे. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, कर्मातीत बनायचे असेल तर कोणत्याही कर्मेंद्रियाद्वारे विकर्म करू नका’. माया खूप शक्तिशाली आहे. डोळे धोकेबाज आहेत त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या.

ओम शांती। मुलांनो, आत्म-अभिमानी होऊन बसले आहात ना? स्वतःलाच विचारा, प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारावी लागते. बाबा युक्ती सांगतात की, स्वतःला विचारा - मी आत्म-अभिमानी होऊन बसलो आहे का? बाबांची आठवण करत आहे का? कारण ही आहे तुमची रुहानी सेना. त्या सेनेमध्ये तर नेहमी तरुणच भरती होतात. या सेनेमध्ये तरुण १४-१५ वर्षांचे देखील आहेत तर ९० वर्षाचे वृद्ध देखील आहेत, आणि लहान मुले देखील आहेत. ही सेना आहे मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी. प्रत्येकाला मायेवर विजय प्राप्त करून बाबांकडून बेहदचा वारसा प्राप्त करायचा आहे कारण माया अतिशय वाईट आहे. मुले स्वतः देखील जाणतात की माया खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक कर्मेंद्रिय खूप धोका देते. सर्वात पहिले आणि जास्त धोका देणारे कर्मेंद्रिय कोणते आहे? डोळेच सर्वात जास्त धोका देतात. स्वतःची पत्नी असताना देखील दुसरी एखादी सुंदर स्त्री पाहिली की लगेच ती आकर्षित करेल. डोळे खूप धोका देतात. इच्छा होते - तिला स्पर्श करावा. मुलांना समजावून सांगितले जाते - नेहमी बुद्धीने असे समजा की आपण ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहिणी आहोत. यामध्ये माया खूप गुप्तपणे धोका देते, त्यामुळे चार्टमध्ये हे देखील लिहिले पाहिजे की, आज संपूर्ण दिवसभरामध्ये कोण-कोणत्या कर्मेंद्रियाने धोका दिला? सर्वात मोठा शत्रू आहे हे डोळे. तर हे लिहिले पाहिजे - अमकीला पाहिले, माझी दृष्टी गेली. सूरदासाचे देखील उदाहरण आहे ना. त्याने आपले डोळेच काढून टाकले. स्वतःची तपासणी कराल तर कळेल - जास्त धोका डोळे देतात. स्वतःच्या पत्नीलाही सोडून एखादी सुंदर स्त्री पाहिली तर तिच्यावर फिदा होतात. कोणी गाण्यामध्ये हुशार असेल, सुंदर नटलेली असेल तर डोळे लगेच चंचल होतील; म्हणून बाबा म्हणतात - हे डोळे खूप धोका देतात. भले सेवा देखील करतात परंतु डोळे खूप धोका देतात. या शत्रूवर बारीक नजर ठेवली पाहिजे. नाहीतर आपणच आपले पद भ्रष्ट केलेच म्हणून समजा. जी हुशार मुले आहेत त्यांनी स्वतः जवळ डायरीमध्ये लिहून ठेवले पाहिजे - ‘अमकीला पाहिले तर माझी दृष्टी गेली’, आणि मग स्वतःला सजा द्या. भक्तिमार्गामध्ये देखील पूजा करत असताना बुद्धी वेगवेगळ्या दिशांना पळत असते, तर लगेच स्वतःला चिमटा घेतात. तर जेव्हा अशी कोणती स्त्री इत्यादी समोर येते तर लगेच दूर गेले पाहिजे. तिथेच उभे राहून बघत बसायचे नाही. डोळे खूप धोका देणारे आहेत, म्हणून संन्याशी लोक डोळे बंद करून बसतात. स्त्रियांना पाठीमागे, पुरुषांना पुढे बसवतात. काही तर असे देखील असतात जे स्त्रीला अजिबात बघत सुद्धा नाहीत.

तुम्हा मुलांना तर खूप मेहनत करायची आहे. विश्वाचे राज्यभाग्य घेणे काही कमी गोष्ट थोडीच आहे. ते लोक तर १०, १२, २० हजार, १-२ लाख, करोड कमावतीलही आणि खलास सुद्धा होतील. तुम्हा मुलांना तर अविनाशी वारसा मिळतो. सर्व प्रकारची प्राप्ती होते. अशी कोणतीच वस्तू रहात नाही जिच्या प्राप्तीसाठी तुम्हाला डोकेफोड करावी लागेल. कलियुग अंत आणि सतयुगाची आदि यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. इथे तर काहीच नाही आहे.

आता तुमचे हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. ‘पुरुषोत्तम’ शब्द जरूर लिहायचा आहे. ‘मनुष्य से देवता किये…’ तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात. मनुष्य तर बिल्कुल घोर-अंधारामध्ये आहेत. असे पुष्कळ आहेत जे स्वर्गाला पाहू शकत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. मनुष्यांना थोडेच काही ठाऊक आहे. भारतवासी देखील विसरले आहेत की, हेवन काय चीज आहे? ख्रिश्चन लोक देखील स्वतः म्हणतात की, हेवन होता. या लक्ष्मी-नारायणाला गॉड-गॉडेज म्हटले जाते ना. तर जरूर गॉडच असे बनवतील. तर बाबा समजावून सांगत आहेत - खूप मेहनत करायची आहे. रोज आपला पोतामेल पाहा. कोणत्या कर्मेंद्रियाने मला धोका दिला? मुख देखील खूप धोका देते. पूर्वी कचेरी होत असे. सर्वजण आपल्या झालेल्या चुका सांगत असत - मी अमकी वस्तू लपवून खाल्ली. चांगल्या-चांगल्या धनाढ्य घरातील मुली सांगत होत्या, अशा प्रकारे माया वार करते. लपवून खाणे ही देखील चोरी आहे. ती देखील शिवबाबांच्या यज्ञाची चोरी - हे तर खूप वाईट आहे. ‘कख का चोर सो लख का चोर’. माया एकदम नाकाला धरून पकडते. ही सवय खूप वाईट आहे. वाईट सवय असेल तर आपण काय बनणार! स्वर्गामध्ये जाणे काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु त्यामध्ये मग पद सुद्धा आहे ना. कुठे राजा, कुठे प्रजा, किती फरक आहे. तर कर्मेंद्रिये देखील खूप धोका देणारी आहेत. त्यांची काळजी घेतली पाहिजे. उच्च पद प्राप्त करायचे असेल तर पूर्णपणे बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे आहे. बाबा डायरेक्शन देतील माया मग मधेच येऊन विघ्न टाकेल. बाबा म्हणतात - विसरू नका, नाही तर खूप पश्चाताप होईल. नापास होण्याचा देखील साक्षात्कार होईल. आता तुम्ही म्हणता - आम्ही नरापासून नारायण बनणार. परंतु स्वतःला विचारा, आपला पोतामेल (हिशोब) काढा. असे बरेच आहेत, जे नीट समजून घेऊन फार मुश्कीलीने अंमलात आणतात. परंतु बाबा म्हणतात - यामुळेच तुमची खूप उन्नती होईल. पूर्ण दिवसाचा पोतामेल काढला पाहिजे. हे डोळे खूप धोका देतात. कोणालाही पाहाल तर विचार येईल, ही तर खूप चांगली आहे आणि मग तिच्याशी गप्पा मारतील. इच्छा होईल की, तिला काही सौगात द्यावी, हे खाऊ घालावे, आणि तेच चिंतन चालत राहील. मुले समजतात - यामध्ये खूप जबरदस्त मेहनत आहे. कर्मेंद्रिये खूप धोका देतात. रावण राज्य आहे ना. बाबा म्हणतात - तिथे चिंता करण्याचा प्रश्नच नाही कारण रावण राज्यच नाहीये. चिंतेची गोष्टच नाही. तिथे देखील चिंता असेल तर मग नरक आणि स्वर्गामध्ये फरक तो काय राहीला?

तुम्ही मुले अतिशय उच्च पद प्राप्त करण्याकरिता भगवंताकडून शिकत आहात. बाबा समजावून सांगतात - माया निंदा करायला लावते. तुम्ही अपकार केला आहे, मी उपकार करतो. मुलांनो, तुम्ही जर कु-दृष्टि ठेवाल तर आपलेच नुकसान कराल. खूप मोठे ध्येय आहे. म्हणून बाबा म्हणतात - आपला पोतामेल पाहा. कोणते विकर्म तर केले नाही ना? कोणाला धोका तर दिला नाही ना? आता विकर्माजीत बनायचे आहे. तुम्हा मुलांव्यतिरिक्त विकर्माजीतच्या सवंत विषयी कोणालाच माहीत नाहीये. बाबांनी समजावून सांगितले आहे - विकर्माजीत सवंतला ५ हजार वर्षे झाली आहेत, मग विकर्म करतात तर वाममार्गामध्ये जातात. कर्म, अकर्म, विकर्म शब्द तर आहेत ना. मायेच्या राज्यामध्ये मनुष्य जे काही कर्म करतात, ते विकर्मच बनते. सतयुगामध्ये विकार असत नाहीत. तसेच कोणते विकर्म देखील बनत नाही. हे देखील तुम्हीच जाणता - कारण तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही त्रिनेत्री बनले आहात. तर त्रिकालदर्शी, त्रिनेत्री बनविणारे आहेत - बाबा. तुम्ही आस्तिक बनले आहात तेव्हाच त्रिकालदर्शी बनले आहात. संपूर्ण ड्रामाचे रहस्य बुद्धीमध्ये आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन, ८४ जन्मांचे चक्र आणि मग इतर धर्मांची वृद्धी होते. ते काही सद्गती करू शकत नाहीत. त्यांना गुरु देखील म्हणू शकत नाही. सर्वांची सद्गती करणारे एक बाबाच आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. त्यांना धर्म स्थापक म्हटले जाते, गुरु नाही. धर्म स्थापक, धर्म स्थापन करण्याकरिता निमित्त बनलेले आहेत. बाकी ते काही सद्गती थोडीच करतात. त्यांची आठवण केल्याने सद्गती काही होऊ शकत नाही. विकर्म विनाश होऊ शकत नाहीत. ती सर्व आहे भक्ती. तर बाबा समजावून सांगतात माया खूप वाईट आहे, यावरच लढाई होते. तुम्ही आहात शिवशक्ती पांडव सेना. तुम्ही सर्व पंडे आहात. शांतीधाम, सुखधामचा मार्ग सांगता. गाईड्स देखील तुम्हीच आहात, म्हणता - ‘बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि मग दुसऱ्या बाजूने जर कोणते पाप कर्म कराल तर शंभर पटीने पाप लागेल’. जितके शक्य होईल तुम्ही विकर्म करता कामा नये. कर्मेंद्रिये खूप धोका देतात. बाबा प्रत्येकाच्या वर्तनावरून समजतात. मुलांसमोर मायेची वादळे येतात. पती-पत्नी समजल्यानेच वादळे येतात. तर या डोळ्यांवर किती नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण तर शिवबाबांची मुले आहोत. बाबांना वचन देऊन राखी सुद्धा बांधतात आणि तरी देखील माया धोका देते, मग सुटू शकत नाहीत. तुमची कर्मेंद्रिये जेव्हा तुमच्या वशमध्ये (नियंत्रणामध्ये) राहतील तेव्हाच कर्मातीत अवस्था होऊ शकते. हे बोलणे तर खूप सोपे आहे की, आम्ही लक्ष्मी-नारायण बनणार परंतु त्यासाठी समज देखील पाहिजे ना. बाबा म्हणतात - सूचनांचे पालन करा. ‘बाबा-बाबा’ करत राहा. बाबांकडून आम्ही पूर्ण वारसा घेणार. असा टीचर कधीही कुठेही मिळणार नाही. या सर्व गोष्टींना देवता देखील जाणत नाहीत तर मागून येणाऱ्या धर्मांचे कसे बरे जाणू शकतील. बाबा (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मी काहीही सांगितले तरीही असे समजा की हे शिवबाबा सांगत आहेत. शिवबाबा म्हणतात - असे समजू नका की हे दादा सांगत आहेत. हा (ब्रह्मा बाबा) तर माझा रथ आहे, हा काय करतो, तुम्हा मुलांना राजाई तर मी देतो. हा रथ थोडेच देतो. हा तर एकदम गरीब आहे. हा देखील बाबांकडून वारसा घेत आहे. जसा तुम्ही पुरुषार्थ करत आहात तसाच हे देखील करत आहेत. हे देखील विद्यार्थी जीवनामध्ये आहेत. हा रथ लोनवर घेतलेला आहे, तमोप्रधान आहे. तुम्ही पूज्य देवता बनण्याकरिता, मनुष्यापासून देवता बनण्याकरिता शिकत आहात. कोणाच्या भाग्यात नसेल तर ते म्हणतात - ‘मला तर यामध्ये शंकाच आहे, शिवबाबा कसे येऊन शिकवतात. माझ्या तर लक्षातच येत नाही’. बाबांच्या आठवणी शिवाय विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. पूर्ण सजा भोगावी लागेल. ही राजाई स्थापन होत आहे. राजांकडे कितीतरी दासी असतात. बाबा (ब्रह्मा बाबा) तर राजांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. दासी हुंड्यामध्ये देतात. इथेच इतक्या दासी आहेत तर सतयुगामध्ये किती असतील. ही देखील राजधानी स्थापन होत आहे.

बाबा जाणतात - मुले काय-काय करत आहेत. प्रत्येकाच्या पोतामेल वरून बाबा सांगू शकतात. यावेळी जर मृत्यू झाला तर ते काय बनतील! कर्मातीत अवस्था तर सर्वांना नंबरवार सर्वात शेवटी प्राप्त होते. तर ही कमाई आहे. कमाई करताना मनुष्य किती बिझी राहतात, भोजन करत असताना देखील, टेलिफोन कानाला असेल. असे लोक तर ज्ञान घेऊ शकणार नाहीत. इथे गरीब सामान्य लोकच येतात. श्रीमंत लोक तर म्हणतील - फुरसत कुठे आहे. अरे, फक्त बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तर बाबा गोड-गोड मुलांना वारंवार हे समजावून सांगतात की, प्रत्येकाला हा संदेश द्यायचा आहे, जेणेकरून कोणीही असे म्हणू नये की, ‘आम्हाला काय ठाऊक शिवबाबा आलेले आहेत’. बस्स, पूर्ण दिवस ‘बाबा-बाबा’च म्हणत राहा. बऱ्याच मुली खूप आठवण करतात. शिवबाबा म्हटल्यानेच बऱ्याच मुलांचे प्रेमाने अश्रू वाहू लागतात. वाटते की, कधी एकदा जाऊन भेटतो! बाबांना बघितलेले नाहीये तरी देखील तळमळत राहतात आणि ज्यांनी पाहिले आहे ते मानत नाहीत. ती दूर असूनही अश्रू ढाळत राहते. वंडर आहे ना. ब्रह्माचा देखील अनेकांना साक्षात्कार होतो. पुढे चालून अनेकांना साक्षात्कार होईल. मनुष्य मरते वेळी सर्वजण येऊन त्याला सांगतात - भगवंताची आठवण कर. तुम्ही देखील शिवबाबांची आठवण करा. बाबा म्हणतात - मुलांनो, पुरुषार्थामध्ये मेकअप करत राहा (आपल्यातील त्रुटी भरून काढत राहा). संधी मिळाली की त्रुटी भरून काढा. कमाई किती जबरदस्त आहे. कोणी-कोणी तर असे आहेत जे कितीही समजावून सांगा, तरी देखील बुद्धीत येतच नाही. बाबा म्हणतात - असे बनायचे नाही. आपले कल्याण करा. बाबांच्या श्रीमतावर चाला. तुम्हाला बाबा पुरुषांमध्ये उत्तम बनवत आहेत. हे आहे एम ऑब्जेक्ट. बाबा सेवेकरिता किती युक्त्या सांगत राहतात. संदेश तर सर्वांना द्यायचा आहे, ज्यामुळे ते समजतील की, हे तर बरोबर सत्य सांगत आहेत. या लढाईद्वारेच खास भारतामध्ये, आम साऱ्या विश्वामध्ये सुख-शांती होते. अशा प्रकारची पत्रके सर्व भाषेमध्ये छापावी लागतील. भारत किती विशाल आहे. प्रत्येकाला माहीत असायला हवे - ज्यामुळे कोणी असे म्हणू नये की, आम्हाला कळलेच नाही. तुम्ही म्हणाल अरे, विमानातून पत्रके टाकली, वर्तमानपत्रांमध्ये छापले, तरीही तुम्हाला जागसुद्धा आली नाही. हे देखील दाखवलेले आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वत:मध्ये ज्या पण वाईट सवयी आहेत - त्यांची तपासणी करून त्यांना काढून टाकण्यासाठी मेहनत करायची आहे. आपला खरा-खरा पोतामेल ठेवायचा आहे. बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे आहे.

२) असे कोणतेही कर्म करायचे नाही, ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल. आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे. जरा सुद्धा कु-दृष्टी ठेवायची नाही.

वरदान:-
स्थूल अथवा सूक्ष्म मध्ये प्रत्येक आदेशाचे पालन करणारे संपूर्ण फरमानबरदार भव

स्थूल आदेश पालन करणाऱ्याची शक्ती त्याच मुलांमध्ये येऊ शकते जे सूक्ष्म आदेशाचे पालन करतात. सूक्ष्म आणि मुख्य आदेश आहे - ‘निरंतर आठवणीमध्ये राहा आणि मन-वचन-कर्माने पवित्र बना’. संकल्पामध्ये देखील अपवित्रता किंवा अशुद्धता नसावी. जर संकल्पामध्ये जरी जुने अशुद्ध संस्कार टच करत असतील तर संपूर्ण वैष्णव अथवा संपूर्ण पवित्र म्हणता येणार नाही. त्यामुळे कोणताही एक संकल्प सुद्धा आदेशाशिवाय चालू नये तेव्हाच म्हणणार - संपूर्ण फरमानबरदार (संपूर्ण आज्ञाधारक)

बोधवाक्य:-
बाबांना ओळखून अंतःकरणापासून ‘बाबा’ म्हणणे हीच सर्वात मोठी विशेषता आहे.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

एकरस स्थिती बनविण्याकरिता कर्मयोगी बना. कर्मयोगी असणाऱ्या समोर कोणी कसाही आला तरीही तो स्वत: नेहमी न्यारा आणि प्यारा राहील. तो नॉलेजद्वारे समजेल - यांचा हा पार्ट सुरू आहे. तो चांगल्याला चांगले समजून साक्षी होऊन बघेल आणि वाईटाला दयाळू बनून दयेच्या दृष्टीने परिवर्तन करण्याच्या शुभ भावनेने साक्षी होऊन बघेल, हीच एकरस स्थिती बनविण्याचे साधन आहे.